25 March, 2016

साद नंदनवनाची



हिमालयाची सगळी मोहक रूपं अनुभवायची असतील तर आपल्या जम्मू-काश्मीर राज्यातल्या श्रीनगर प्रांतात गेलं पाहिजे. उंच बर्फाच्छादित शिखरं, पाताळाचा वेध घेणाऱ्या खोल दऱ्या, हिरव्यागार पाचूच्या रंगाची मदानं, भव्य चिनार वृक्ष, पर्वत उतारांवरचे सुचीपर्णी वृक्ष, अवाढव्य पसरलेलं दल सरोवर, मुघलकालीन बागा, उमदे घोडे, त्यावरून मारलेली रपेट, देखणे हिमालयीन पक्षी, दौडत जाणाऱ्या नद्या, खळाळते निर्झर, फुलांचे ताटवे आणि रसनेला तृप्त करणारे शाही खाद्यपदार्थ. तमाम सुखसोयी आणि नेत्रसुखद निसर्ग अशी पर्यटकांची आकांक्षांची पूर्ती करणारं हे ठिकाण म्हणजे पृथ्वीवरचं नंदनवनच आहे. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीचं आणि हनिमूनला जाणाऱ्या जोडप्यांचं हे एके काळचं आवडतं ठिकाण मध्यंतरी दहशतवाद्यांच्या सावटाखाली होतं. ते काळे ढग दूर झाले आणि आता श्रीनगर पुन्हा एकदा पर्यटकांच्या झुंडींनी गजबजून गेलं आहे. पर्यटक आले तर या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेची चाकं गतिमान होतात हे आता तिथल्या लोकांच्या ध्यानी आलं आहे. नव्वदच्या दशकात जमलेली काजळी आता दूर झाली आहे.

श्रीनगरला हवाईमार्गे किंवा जम्मूपर्यंत रेल्वेने जाऊन पुढे रस्तामाग्रे पोहोचता येतं. हाऊसबोटमधलं वास्तव्य ही श्रीनगरची एक खासियत. या हाऊसबोटमध्ये राहण्याची मजाच काही और असते. अप्रतिम कलाकुसर, नक्षीकाम आणि काश्मिरी गालिचे यांनी नटलेल्या या हाऊसबोटी दल लेकची मजा द्विगुणित करतात. सरसपाटा करून आल्यावर, हाऊसबोटच्या डेकवर बसून प्यायलेला कहावा किंवा चहा-कॉफी या पेयांची लज्जत आणखीनच वाढवते. श्रीनगरच्या हाऊसबोटवरचं रात्रीचं जेवण खासच असतं. शाकाहारींसाठी फिरणी आणि मांसाहारींच्या आवडीचे गोश्त आणि शामी कबाब असे पदार्थ पुढे अनेकदा रसनेला त्यांची आठवण करून देत राहतात.

संध्याकाळच्या कलत्या उन्हात शिकाऱ्यातून जलविहाराला जाणं ही आणखी एक राजेशाही जीवनशैलीमधली गोष्ट इथे आपली वाट पाहात असते. चार चिनार, समोरच उंचावर दिसणारा आद्य शंकराचार्यानी बांधलेला मठ (शंकराचार्य मंदिर), चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या ओळखीच्या वाटणाऱ्या जागा, सभोवताली दिसणारी उंच शिखरं, फुलांचे ताटवे, निळाईने भरून राहिलेलं दल सरोवर, काठाला बिलगून िहदकळणाऱ्या रांगेत उभ्या असलेल्या हाऊसबोटी, सरोवराच्या काठाला असलेली विविध वस्तूंची दुकानं असं सगळं शिकाऱ्यात पहुडल्या पहुडल्या न्याहाळत आनंद घेताना सुख म्हणजे नक्की हेच असतं असं वाटतं. याच फेरफटक्यादरम्यान फुलं, नक्षीकाम केलेल्या हस्तकलावस्तू, काश्मिरी शाली, ड्रेस मटेरियल विकणारे आपापल्या नावेतून येताना पाहून मावळतीच्या प्रकाशात एक छानसा फोटो आपण नकळत घेतोच. फ्लोटिंग मार्केट हे तिथलं आणखी एक वैशिष्टय़. दल लेकचं किती म्हणून वर्णन करावं. सरोवराच्या पृष्ठभागावर तरंगणारी कमळाची पानं आणि मधूनच उमलणारं कमळ, त्याचा आधार घेत बसलेला पॉण्ड हेरॉन, विविधरंगी बदकं, खंडय़ा, घार, गरुड असे अनेक प्राणी या विहारादरम्यान आपलं लक्ष वेधून घेतात. इथली जादूई संध्याकाळ हळूहळू आपली पकड घेते. गार वाऱ्याची झुळूक अंगावर एक गोड शिरशिरी उमटवते, काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यातून वाहात येणारा हा वारा मन प्रसन्न करत असतो. आकाशात एकेक तारकेची उपस्थिती जाणवायला लागते. क्षितिजावरची लाली गडद होत जाते. आजूबाजूचे डोंगर निळाईत गुडूप व्हायला लागतात. संथपणे चालणाऱ्या शिकाऱ्याच्या बाजूने झपझप वल्हे चालवत छोटय़ा छोटय़ा होडय़ा ये-जा करत असतात. त्यांनी निर्माण केलेल्या लाटांच्या आवर्तनात मन झुलत राहातं. विस्तीर्ण आकाश आणि त्याखाली तेवढाच विस्तीर्ण दल सरोवराचा जलाशय एकमेकांच्या डोळ्यांत डोळे मिसळून पाहात असतात. अनंत काळचे प्रेमीच जणू.

श्रीनगरला शालिमार गार्डन, निशांत बाग, चश्मे शाही गार्डन, मुघल गार्डन अशा अनेक बागा फार पूर्वीपासून आकर्षणाचं केंद्र राहिल्या आहेत. या बागांमधून फिरताना तिथल्या अप्रतिम सौंदर्याचा तर आनंद घेता येतोच, पण श्रीनगरचं पक्षिवैभव याच बागांमधून सहज न्याहाळता येतं. इथे एप्रिल मध्यापासून मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ादरम्यान फुलणाऱ्या टय़ूलिपमुळे टय़ूलिप गार्डनला स्वर्गीय सोहळ्याचा साज चढलेला असतो.  या अशा बागांमधून निवांतपणे फिरण्यात जी मजा असते ती सहजीवनाच्या सुरुवातीला घेतली तर आठवणींच्या कुपीतला बराच भाग कायमचा व्यापला जाईल.

सोनमर्ग, पहलगाम, गुलमर्ग, बेताब व्हाली अशी ठिकाणं ही श्रीनगरच्या जवळपासची पाहिलीच पाहिजे अशी देखणी स्थळं आहेत. गंडोला राइड घेऊन उंचावरून व्हॉलीचं विहंगम दृश्य पाहाता येतं. या सगळ्याच ठिकाणी जाताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेतं, केशराची फुलं, वाहते अवखळ प्रवाह, दऱ्या-डोंगर, उतारावरची काश्मिरी घरं आणि वस्त्या, सफरचंदी गाल असलेली मुलं, डोंगरदऱ्या पाहाताना मन मोहून जातं. मोकळी स्वच्छ सुंदर हवा, निवांतपणाचा अनुभव देण्यासाठी वर्षांच्या बहुतेक महिन्यांत इथला निसर्ग आपली वाट पाहात असतो; पण हल्ली हिवाळ्यातल्या इथल्या सहली संस्मरणीय ठरत आहेत. गोठलेलं दल सरोवर, भुरभुरती बर्फवृष्टी, शुभ्र हिमशिखरं आणि बर्फाचीच चादर ओढून गारठलेलं खोरं असं इथल्या हिवाळ्यातलं दृश्य असतं. सहज उपलब्ध होणारी हॉटेल्स, वाहतुकीची साधनं आणि गर्दीचा अभाव यामुळे स्वप्नवत वाटणारी सहल केल्याचा आनंद नक्कीच मिळतो.


एकूण काय, एप्रिल-मेमध्ये गेल्यास टय़ूलिप गार्डन आणि टपोऱ्या गुलाबांचा फुलांचा ताटवा, जुल-ऑगस्टमध्ये गेल्यास सफरचंदांनी लगडलेल्या बागा आणि जागोजागी पसरलेला रानफुलांचा गालिचा, हिवाळ्यात बर्फवृष्टीचा अनुभव असे निसर्गाचे अनेक अवतार या ठिकाणी अनुभवता येतात. याशिवाय खोऱ्यामधला अप्रतिम निसर्ग सदासर्वदा सहल साजरी करण्यासाठी पुरेसा असतोच. या सहलीमधले हळवे क्षण आयुष्यभर साथ देत राहतात. मन:पटलावरची दृश्यं पुन:प्रत्ययाचा आनंद देत राहतात. जाण्यासाठी मात्र पावलं उचलायला हवीत.



No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates