31 December, 2015

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे


मंगेश पाडगावकरांनी माझ्या पिढीला गाणं गायला लावलं. त्यानी गद्य माणसालाही पद्य म्हणायला लावलं.
कोकणातल्या माझ्या गावात डोगरावर हुंदडताना रंगभरल्या आकाशाकडे बघताना ‘रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली? ही त्यांची ओळ गुणगुणताना त्या वयात आकाशाची शोभा मी पाहिली, पाडगावकरानी ती ओळ लिहिली नसती तर कदाचीत समोरचं सुंदर आकाश मी न्याहाळलंच नसतं. ‘काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली’ तिन्हीसांजेचं एवढं समर्पक वर्णन आणखी कुणी केलं असेल असं मला वाटत नाही. ऋतू बदल होताना आता निसर्गाचा वेगळा अविष्कार पहायला मिळणार म्हणून मी खुश व्हायचो ते  त्यांच्याच ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ या ओळीमुळे. पुढे मग दुर्गाबाईंचं ‘ऋतूचक्र’ वाचनात आलं, पण ऋतूंबद्दलची आवड, जाण पाडगावकरांच्या त्या ओळीने लहानपणातच करून दिली. एकाच गाण्यातून एवढं चमत्कृतींनी भरलेलं जग दाखवण्याची ताकद या माझ्या कोकणातल्या मंगेशाकडे होती. त्यांचं पहिलं दर्शन सावंतवाडीच्या मोती तवाकाठच्या आमच्या कॉलेजमध्ये झालं, बरोबर बा.भ.बोरकर आमचे वसंत सावंत सर असे कविवर्य होते. थोड्याशा नाटकी ढंगाने केलेलं पाडगावकरांचं कविता वाचन ऎकून आम्ही प्रथमता हसत सुटलो होतो. पण लहानपणापसून  रेडिओवर आणि बालभारतीमधून भॆटणारा हा कवी असा प्रत्यक्ष पाहिल्यावर आम्ही हुरळून गेलो होतो.

पुढे मुंबईत आल्यावर पाडगावकर अनेक कार्यक्रमांमधून ऎकता आले. प्रत्यक्ष भेट झाली आणि हा कवी बापमाणूस म्हणूनही माहित झाला. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ म्हणणारा हा कवी तत्ववेत्ताच म्हणायचा. आत्महत्येला प्रवृत्त झालेला माणूस हे गाण ऎकून पुन्हा नव्या जोमाने आयुष्याला सामोर गेला, अशी या गाण्याबद्दलची एक आठवण अरुण दाते सांगतात.

‘पाचूच्या हिरव्या माहेरी उन हळदीचे आले’ हे पाडगावकरच लिहू शकतात.  ‘जिथे तिथे राधेला भेटे आता शाम मुरारी’, ‘एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना’ ‘चंद्र कोवळा पहिलावहिला झाडामागे उभा राहिला’, ‘अवती भवती असुन दिसेना शोधतोस आकाशी हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी’ ‘चांदण्यात भिजला गालावरचा तिळ’ ‘स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास’, ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’ ‘का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?’, ‘वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा’, ‘’त्या तरुवेली, तो सुमपरिमळ झर्‍यांतली चांदीची झुळझुळ’, ‘चांदण्याला नीज आली’, ‘मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे’, ‘लक्ष चंद्र विरघळले गात्री’, ‘मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली’, ‘जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातिल अनंद’, ‘लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रिती’, ‘माझे जीवन गाणे’ असे किती किती मोत्यांचे सर तुम्ही सहज ओवित गेलात, खरंच तुम्हाला अंतर्यामी चा सूर गवसलेला होताच. पाडगावकर, तुम्ही असे गीतातूनी सर्वस्व आहे वाहिले, ते शब्द आता राहिले......., ते शब्द आता राहिले....!                 


आकाशातल्या शुक्र तार्‍याकडे नजर जाईल तेव्हा कवीवर्य पाडगावकर तुमची नक्कीच याद येईल. भारलेले अनेक क्षण तुम्ही दिले  आणि आमचाही जन्म भारून टकलात. अनंत काळ दरवळत रहाणारा तुमच्या ‘अंतरीचा गंध’ तुम्ही आमच्यासाठी सोडून गेला अहातच.              

24 December, 2015

धरित्रीचे देणे


अर्धी रात्र सरलेली
जागे सपान उशाला
कानी कपाळी ओरडे
जाग आली स्मशानाला

किती नाती अशी मेली
काही अर्धीच राहीली
विण नात्यातली आता
काहो अशी उसवली?

त्याने धरित्रीचे देणे
असे फुंकून टाकले
आणि रान तुकड्याचे
कसे विकून टाकले?

काहो मरते ही माती
नाती माती माती होती
किती राखावी तरीही
असे ओंजळ ही रिती

आता गुंता सारा झाला
टाळे पडे घरट्याला
किती टाळावे तरीही
जागे सपान उशाला

नरेंद्र प्रभू

२४/१२/२०१५ 

16 December, 2015

भिमाशंकर ट्रेक



कितीतरी दिवस भिमाशंकरला नेरळ-कशेळे-खांडस-काठेवाडी मार्गे जायचा फक्त बेत आखत आम्ही बसलो होतो. माझा मित्र अतूल जाण्याचा दिवस ठरवणार आणि मग आम्ही निघणार असं चालू  होतं, पण तो दिवस अचानक नक्की झाला आणि मी तयार झालो. फारशी तयारी न करता कैलासची परिक्रमा पायी केल्याने मला ‘आपण जावू’ असा विश्वास होता पण सह्याद्री काही बच्चा नाही. इथल्या पायवाटा एका गावात म्हणता म्हणता दुसर्‍याच ठिकाणी कधी नेवून पोहोचवतील याचा पत्ता लागणार नाही.  

चित्रकार योगेश आगिवले
योगेशने साकार केलेलं एक चित्रं
भल्या पहाटे निघायचं असं ठरवलं तरी नेरळला आठ वाजता पोहोचलो आणि पहिल्यांदा हनुमानाचा प्रसाद मिळाला. त्याने पुढचा सगळा प्रवास सुखकर केला. हा हनुमान अतूलचा मित्र. अतूलची त्याच्याशी खुप छान मैत्री असावी. अगत्याने आपल्या घरी घेवून गेला. त्याच्या घरच्यानी हसून स्वागत केलं. बाहेरच्या खोलीत बसलो तर भिंतीवर अनेक चित्रं टांगलेली होती. या घरात ही चित्रं आहेत म्हणजे चित्रकार पण घरचाच असावा असं अतूलशी बोलतानाच हनुमानचा छोटा भाऊ योगेश आगिवले हाच समोर आला. ती चित्रं त्यानेच काढली होती. एवढ्या लहानश्या गावात असा चित्रकार असावा आणि मुख्य म्हणजे तो आपली कला जपत आहे हे पाहून खुप आश्चर्य वाटलं. त्याचा हात बरा होता. त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. चित्रकार मित्र शरद तावडे यांच्या संपर्काचा सल्ला त्याला दिला.  हनुमानच्या घरीच आमची उत्तम अशा न्याहारीची सोय झाली. हनुमानच्या घरच्या प्रेमळ माणसांचा अल्प सहवास लक्षात रहाण्यासारखा आहे.

पहिल्यांदा काठेवाडीला सोडतो म्हणणारा हनुमान मग आमच्या सोबत शिडीघाटातून भिमाशंकरला यायला तयार झाला. चला म्हणजे आता वाट चुकण्याची शक्यता नाही. लहानपणापासून दर त्रिपुरारी पोर्णिमेला आणि अधेमधे भिमाशंकरला जाणारा हनुमान सोबत आहे म्हणून आम्ही निर्धास्त झालो. दोन तासाची डोंगरवाट चढण्याची तयारी मनाशी केली होती. पण शिडी घाटाचा उभा चढ, थंडीने फिरवलेली पाठ आणि दुपारची चढती उन्हं यामुळे घामाच्या धारा आणि श्वास लागल्याने  गती मंद झाली. दिड-दोन तासांची ती रपेट पार तीन तासांनी पुर्ण झाली.

भिमाशंकरचं जंगल चढताना प्रदुषणाच्या धुरक्याचा भला मोठ्ठा पट्टा कल्याण अंबरनाथ परिसरावर पसरलेला दिसत होता. समोरची गावही त्याच्या विळख्यात गडद होत गेली. उभ्या चढावरून आम्ही पहिल्या शिडीपाशी येवून पोहोचलो. पहिली, त्या नंतरची दुसरी शिडी सहजच चढून गेलो. मग पुन्हा चढती, सुर्य डोक्यावर आला होता. पुन्हा एक शिडी लागली आणि एका ठिकाणी बसायला बर्‍यापैकी
ऎसपैस जागा मिळाली. “इथे बसू पाच मिनीटं”, असं हनुमंत म्हणाला. फोटो काढले. आता शिड्या संपल्या. चला एक टप्पा तर पार केला या फुशारकीतच मी उठलो आणि लगेच निमुळत्या खडकावरून
याच मार्गाने ट्रेक केला 
पुढे जावं लागलं. एका अरुंद जागेत अतूलच्या पाठीवरची सॅक अडकली, ती खाली ठेवून पुढे जाऊन त्याने परत घेतली. मागोमाग मी जात होतो. वाकून चाला असा हनुमंतने सल्ला दिला. तो भाग पार पडला. पुढचा खडक चढून जाणं अधिक कठीण होतं. माझी सॅक, कॅमेर्‍याचे बॅग केव्हाच अतूल आणि हनुमानने घेतली होती. वरच्या कपारीत हात घट्ट रोवले, मग दोन्ही पाय खाचेत पक्के केले आणि शरीर वर झोकून दिलं......,  वर चढलो. पुन्हा सत्तर-ऎशीच्या कोनात सरळ चढ सुरू झाला. आत्ता कुठे पहिला टप्पा संपला होता. पण कठीण टपा पार झाला होता. एक वाजता भिमाशंकरचं दर्शन झालं.

दुसर्‍या दिवशी भिमाशंकर- कल्याण असा सहा तासाचा एसटीचा प्रवास किंवा शिडी घाट अथवा गणेश घाटमार्गे पुन्हा खांडस असे पर्याय होते. सकाळी मंदीरात जावून दर्शन घेतलं आणि गणेश घाट मार्गे उतरायला सुरूवात केली. शिडी घाटापेक्षा हा मार्ग अधिक सोपा पण दुप्पट वेळ खाणारा होता. हे असंच असतं. कठीण परिश्रम घेतले तर लवकर यश प्राप्त होतं. पण उतरताना हनुमान सोबत नव्हता आणि शिडीघाटातून उतरणं धोकादायक वाटलं म्हणून गणेश घाटातून उतरलो. एका ठिकाणी अतूलने थोडं पुढे जावून निरिक्षण करायला सुरूवात केली. समोर शिडीघाट दिसत होता. काल आम्ही जे धोकादाय वळण आणि खडक पार केलं ते दूरवर समोर दिसत होतं. त्याचे फोटो घेतले आणि आता ते पाहिले तेव्हा लक्षात आलं की काल काय दिव्य पार केलं ते.

खुप मोठा आत्मविश्वास, दोन दिवसत भरून घेतलेली शुद्ध हवा आणि पुन्हा एखाद्या ट्रेकला जाण्याची जिद्द मनात बाळगून परतलो. मात्र हनुमंताची कृपादृष्टी हवीच.                        
                             


                                          







LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates