21 April, 2015

खळाळता झरा - मनोहर गांगण


सुप्रसिद्ध फाईन आर्ट फोटोग्राफर आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य मनोहर गांगण यांचं नुकतंच दु:खद निधन झालं. मनोहर गांगण यांना श्रधांजली वाहण्यासाठी बॉम्बे आर्ट सोसायटी तर्फे शोकसभेचं आयोजन करण्यात येणार आहे. सदर सभा ऑडीटोरीयम हॉल, जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे दिनांक २५ एप्रिल २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे, असं संथेचे अध्यक्ष चित्रकार वासुदेव कामत यांनी कळवलं आहे.    

हरहुन्नरी कलाकार, मनमिळावू; प्रेमळ मित्र आणि ‘चित्रकार फोटोग्राफर’ अशी स्वत:ची वेगळी छाप कलाजगतात सोडून मनोहर गांगण अकाली निघून गेले. उत्साहाचा अखंड झरा असलेला हा माणूस खर्‍या अर्थाने कला आणि निसर्ग जगला. गडचिरोली सारख्या आदीवासी बहूल भागात छायाचित्रण केल्यावर, तिथल्या आदीवासींवर मागासलेपणा आणि नक्षलप्रभाव या दोन्ही गोष्टींसाठी त्यानाच जबाबदार धरलं जातं हे या हळव्या कलाकाराने अनुभवलं आणि त्याचं प्रत्ययकारी दर्शन आपल्या अनोख्या नजरेने टिपून पुढारलेल्या समाजासमोर मांडलं.

मुंबईसारख्या जादुईनगरीत
कलासाधना करीत असताना तळकोकणातला निसर्ग त्यांना सतत खुणावत होता. हजारो शब्दात जे सांगता येणार नाही ते त्यांच्या एका छायाचित्रामधून अनुभवता येतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौदर्याचं दृश्य स्वरूप छायाचित्रांच्या माध्यमातून जगाला घडावं म्हणून गेली काही वर्षं ते धडपडत होते. ते काम हातावेगळं करीत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
आजवर त्यांच्या अनेक एकल आणि समूह प्रदर्शनातून रसिकांना आवर्जून भेटणारे मनोहर गांगण आता मात्र त्यांच्या स्तब्द छायाचित्रातूनच भेटणार आहेत. हजारो फाईन आर्ट दर्जाची छायाचित्रं, एरवी जळावू म्हणून उपेक्षीलेल्या लाकडांची ‘काष्टशिल्प’, अशा अजरामर कलाकृतीमधूनच गांगण आता आपल्यात वावरणार आहेत.

वृत्तपत्रासाठी वरील मजकूर लिहिताना मनोहर गांगण या नावापुढे कै. लिहिण्याचं धैर्य झालं नाही. एखादा खळाळता झरा अचानक आटून जावा तसा हा आमचा मित्र आम्हाला सोडून गेला. हे सत्य असलं तरी ते पटत नाही. मित्रवर्य आत्माराम परब यानीही मनोहर गांगण याना शब्दसुमनं वाहिली आहेत ती त्यांच्याच शब्दात पुढे देत आहे.

नरेंद्र प्रभू 


त्याचं मनोहर असणं

आयुष्यातली एखादी गोष्ट करावी की करू नये? असा प्रश्न आपल्याला पडला असताना योग्य मार्गदर्शन करणारा तो ‘गुरू’. ती गोष्ट का केली पाहिजे? याचं पटेल असं उत्तर देणारा तो ‘तत्वज्ञ’ आणि त्या निर्णयाच्या परिणामांमध्ये साथ देणारा तो ‘मित्र’. मनोहर  गांगण माझ्यासाठी हे तिन्ही होता. हे ‘होता’ म्हणताना जीभ जड होतेय. मनोहरचं नसणं एखादा अवयव गमावण्यासारखं वाटतं मला. देण्याघेण्याच्या पलिकडे जावून फक्त मैत्रीखातर पाठीशी उभा राहणारा हा आधार आता नाहीसा झाला आहे. त्याचं ते ‘मनोहर’ असणं हाच माझ्यासाठी दिलासा असायचा...!

कस्टमच्या नोकरीचा राजिनामा देवून टुर कंपनी काढायचा जगाच्या दृष्टीने आतबट्ट्याचा वाटणारा निर्णय मी घेवू पहात होतो आणि असं करावं की करू नये या व्दंद्वात फसलेला असताना मनोहर गांगण या माझ्या मित्राने मला जीवनाला कलाटणी देणारा तो निर्णय घ्यायला मला मानसिक ताकद दिली. मनोहर सोडून ‘परळच्या गल्लीतल्या माझ्यासारख्या सरकारी नोकरीत स्थिर झालेल्याला’ ती नोकरी सोडायचा सल्ला कुणीही दिला नसता. त्याच्या ‘लेन्सला’ आजचा ‘ईशा टुर्स’चा उज्वल भविष्यकाळ त्या वेळीच दिसला होता.  मनोहर माझा भविष्यकार होता.

गेली सात-आठ वर्षं आम्ही अगोदरसारखे भेटू शकत नव्हतो. पण त्याचं लक्ष असायचं ‘टेली
लेन्स’मधून. जहांगीर दालनातील त्याच्या प्रदर्शन सोहळ्यासारख्या समारंभाना आम्ही आवर्जून एकत्र यायचो. ईशा टुर्सच्या सहलींना तो यायचा, नजर कशावर असली पाहिजे हे शिकायला मिळायचं ते त्याच्या बोलण्यातून आणि छायाचित्रातूनही. पट्टीचा छायाचित्रकार होता तो. कितीतरी गहीरे क्षण कॅमेर्‍यात बंदिस्त करून मनोहर कायमचा निघून गेला. न सांगता सवरता तो असा उठून गेला. माझ्यासारख्या शेकडो जणांना त्याने  प्रेरणा दिली, स्वत:च्या पायावर उभं केलं. आणि पुढच्या पायरीवर हात दिला, साथ दिली.

मी, मनोहरच्या घराचाच मित्र, माझ्या अनेक समस्यांवर विचार करण्यात किती रात्री त्याच्या घरी जागवल्या आम्ही. आणि हे सगळं हक्काने व्हायचं, हट्टाने व्हायचं. आता तो क्षितिजावरचा तारा बनलाय, दिवसाच्या उजेडातही लुप्त होणारा.


आत्माराम परब. 

12 April, 2015

पुर्ण‘स्त्री’


तू सुंदर आहेस...
तू सुंदर आहेस......
तू सुंदर........... 
खबरदार पुन्हा असं बोललास तर
‘मी’ शब्दातीत आहे.
माझ्या अंतरंगातील खोली शोधण्याचा प्रयत्न करून पहा..
बघ मी किती शौर्यवान आहे, किती धैर्यवान आहे,
पहायचंच असेल तर माझं बुद्धीचातुर्य पहा..
माझ्या हजरजबाबीपणाला दाद दे...
‘मी’ ह्सण्याने सारं जग हसतं,
माझ्या आनंदात सारं जग डुलतं...
स्तूती करायचीच असेल तर मी केलेल्या पालनपोषणाची कर
या जगाच्या सौदर्यात ‘मी’ घातलेली भर बघ...
माझ्या हृदयातून पाझरणारी करुणा पहा,
पहा, माझ्या बुद्धीचातुर्याने कलात्मकतेत कशी वाढ झाली...   
माझ्या सभोवताली ही बंधन घालू नकोस...
‘मी’ काय करावं, काय नको ते मला शिकवू नकोस...
मला मर्यादेचं भान आहे,
म्हणून म्हणते...
तू सुंदर आहेस..., असं म्हणू नकोस
बघ.... मी सगरासारखी अथांग आहे,
माझी अनेक रुपं तू अजून पाहिलेली नाहीत,
माझ्यातल्या अपार अंतरंगाचा ठाव अजून लागायचा आहे,
मी फक्त सुंदरच नाही, तर...
मी पुर्णत्व आहे..

मी पुर्ण‘स्त्री’ आहे. 

11 April, 2015

पुन्हा एकदा त्या वाटेवर


गोव्याच्या सांकृतीक जीवनात देवळांचं महत्व अनन्यसाधारण आहे. अनेक उत्सव पारंपारीक प्रथानुसार अगदी उत्साहात साजरे केले जातात. असाच एक उत्सव कवळ्याच्या शांतादुर्गा मंदीरात सुरू आहे. ‘भागवत सप्ताहा’च्या निमित्ताने गेले सहा दिवस चालू असणार्‍या या उत्सवाची उद्या सांगता होणार आहे. अगदी पहाटेपासून सुरू होणारी पुजा-आर्चा, नंतर भागवत कथेचं संहितावाचन, मग आरती, प्रसाद सायंकाळी चार वाजता निरुपण, आरती, लालखी, पालखी असा अगदी रात्रोपर्यंत चालणारा भरगच्च कार्यक्रम मंदीरात चालू असतो. गोव्यातले, गोव्याबाहेर गेलेले महाजन, आजूबाजूच्या गावातली जनता आणि पाहूणे-रावळे दिवसभरात दर्शनासाठी येत रहातात.

सौ. व श्री. पांडुरंग नाडकर्णी (देवस्थानचे अध्यक्ष) ज्यांच्या
निमंत्रणामुळे आम्ही या संधीचा लाभ घेवू शकलो.
   
अमाप उत्साह आणि तेवढीच शिस्त हे या सोहळ्याचं आणखी एक वैशिषट्य. सात दिवस रोज पाच तास चालणारं ह. भ. प. मकरंदबुवा रामदासी यांचं निरुपण ऎकायला जमणारी गर्दी ही श्रोतृवर्ग कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे. श्रवणाची कला हरवत चाललेल्या आताच्या काळात ही गर्दी नन्हे तर दर्दी माणसांची भक्तीरसात न्हावून निघालेली मैफील पाहून धन्य वाटतं.

शांतादुर्गा देवस्थानचा निर्मळ परीसर, मंगलमयी वातावरण, फुलांच्या सुगंधाचा घमघमाट आणि घंटेचा निनाद, टाळ-मृदुंगाची धुन, सनईचा मंजूळ स्वर, धुपाचा दरवळ या सगळ्या वातावरणात घटकाभर म्हणून आलेल्याला खिळवून ठेवण्याची ताकद आहे.


गोव्याचा हा सांकृतीक वारसा जपणारी ही मंदीरं, तिथले लोक आणि कलाकार यांचा नित्यनेमाने चाललेला कुळाचार पाह्ण्याची, अनुभवण्याची संधी जेव्हा केवा मिळेल तेव्हा अवश्य घ्यावी मरगळलेल्या मनाला तजेला आणि आठवणीमधून धुसर होत जाणारा सांकृतीक पट पुन्हा एकदा उलगडवून दाखवण्याची ताकद त्यात नक्कीच आहे.



पुन्हा एकदा त्या वाटेवर
दरवळला की सोनचाफा
बहर मोगर्‍याला आला अन
सडा पसरला प्रजक्ताचा

पुन्हा एकदा त्या वाटेवर
भक्तीसरचा पाझर फुटला
धुप, दिप, नैवेद्य असाहा
तुम्हास देता कितीक उरला

पुन्हा एकदा त्या वाटेवर
शांतादुर्गा पालखीतुनी
देते आशिश सकल जनांना
दिसे साजीरी लालखीतुनी  


05 April, 2015

मित्रांगण – एक वेगळा अनुभव


समाज माध्यमांचा सुळसुळाटात आणि एकावर एक धडकणार्‍यां लाटांत काय निवडावे हे कळेनासं होतं. नेट बंद ठेवल्याशिवाय विचारकरणंही कठीण होवून बसतं. कधी-कधी हे सगळं नकोसं होतं, पण कधीतरी काही हवं हवंसं गवसतं आणि आपण पुन्हा अकदा त्या जाळ्यामध्ये स्वत:ला गुतवून घेतो. ‘मित्रांगण’ने मला असाच सुखद धक्का दिला तो फेसबुकमुळे. या फेसबुकच्या माध्यमातून मित्रांगणचे संपादक श्री. वैभव कुलकर्णी यांची ओळख झाली आणि त्याचं फलित म्हणून मित्रांगणचा देखणा अंक हाती पडला. प्रथमदर्शनी हा देखणा अंक पहून बरं वाटलं, पण असे कित्तेक देखणे अंक वाचल्यावर आवडतातच असं नाही. कागद, छपाई, छायाचित्रं आणि प्रसिद्धी एवढ्या भांडलावर अंक वाचनिय होत नसतो तर त्यातील लिखाण, आशय, विचार यांनीच तो समृद्ध होत असतो. या सर्वांच्या जोडीला जर निटनेटकेपणा आणि देखणेपण असलं तर ‘सोनेपे सुहागा’ (दुघात साखर म्हणत नाही, कारण हल्ली साखर सगळ्यानाच चालत नाही आणि तिचे दुष्परीणाम ‘खायला मरता की मरायला खाता?’ या मित्रांगण मधल्या लेखानेच ठळकपणे समोर आणले आहेत.)

तर, अगदी संपादकियापासूनच चौकटी बाहेरचा वेगळा विचार वाचकांपर्यंत पोहोचवणारा हा अंक खरंच खुप आवडला. ‘खायला मरता की मरायला खाता?’ या लेखामधलं वास्तव समजल्यावर आपली जीभ आता आपल्या ताब्यात राहिलेली नसून ती ‘बहूराष्ट्रीय अंडरवर्ल्ड’ ची गुलाम बनली आहे हे समजलं सुक्ष्म जीवशास्त्राचा लेक्चरर आणि साउथ इंडियन हॉटेलवाला असलेल्या शिवा ऎथाल यानी हा लेख लिहिल्याने त्याला वेगळं महत्व आहे हे विसरून चालणार नाही. कोवळ्या वयात आयुष्य गहाण टाकणारा मुकुंद, ‘बॉर्डरलेस वर्ल्ड’ चे अधिक यांचं गेल्या सतरा वर्षातलं काश्मीर मधलं मानवतेने ओतप्रोत भरलेलं काम, गाळाने भरलेली सुप्त धरणे, नववर्षाचं स्वागत, अजंठ्यातील विज्ञान असे अनेक लेख, हे सगळंच मुळातून वाचण्यासारखं आहे.

असा हा विविध विषयावर वेगळे विचार मांडणारा अंक आवडला. मात्र अर्थ किंवा गुंतवणूक विषयक एखादा लेख सदर अंकात असला तर मराठी माणसाचं तिकडेही लक्ष जाईल.     

मित्रहो, असं लेखन वाचलंच पाहिजे, तुम्ही वाचलं तर ते वाचेल. मी हा अंक वाचला, संपादक वैभव कुलकर्णी म्हणतात तशा वाचलेल्या वेळातून. वेळ काढाल तर वेळ वाचेल. संपादक वैभव कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांचं अभिनंदन. 

नरेंद्र प्रभू
विलेपार्ले, मुंबई



LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates