16 February, 2014

ते लहाने होते म्हणूनी


भर दिवसाही ज्यांच्या डोळ्यासमोर केवळ अंधाराचंच साम्राज्य असतं त्याला प्रकाशाचा एक किरण पाहाण्याची केवढी मोठी आस लागून राहाणार याची कल्पना डोळसांना येणं कठीणच आहे.  कधी काळी देवाची आपल्यावर कृपादृष्टी होईल आणि आपल्याला दृष्टी येईल याचीच याचानामय प्रार्थना हे लोक देवाजवळ नक्कीच करीत असतील, पण तो देवही एवढा दयाळू असेल का? मुळात तो दयाळू असता तर त्याने तो प्रकाशच आमच्या डोळ्यासमोर का येवू दिला नाही?  असं.... ते आर्त स्वरात आपलं दु;ख़ व्यक्त करणार्‍याच्या हाकेला खरंच एकदा देव ओ देतो. डॉ. लहानेंच्या स्वरूपात तो त्याना दर्शन देतो. आता दर्शन देतो म्हटल्यावर दृष्टी ही यायलाच हवी,  ती दृष्टी सुद्धा हा लहानेदेव देतो. हा देव शिबिरं भरवतो. केवळ आपला फायदा व्हावा म्हणून समुहाला वापरून घ्यायच्या या युगात दृष्टीहिनांच्या समुदायाला एकत्र करून त्याना दृष्टीदान करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारा हा महामानव आपली नित्य जबाबदारी पार पाडत असतानाच वरोर्‍याच्या आनंदवनातही अगदी नेमाने जातो. एरवी स्वत:ला उपेक्षीत समजणाराही ज्यांच्यापासून चार हात दूर उभा राहतो अशा  कुष्टरोग्यांवरही लहानेसाहेब आईच्या ममतेने आणि बापाच्या जबाबदारीने शस्त्रक्रिया करतात. चार दिवसापुर्वी रुग्णांविषयी वाटणार्‍या काळजीतूनच त्यानी निदर्शनं करणार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर आज त्यांनाच अटकपुर्व जामिनासाठी धावपळ करावी लागत आहे.

याच समाजाचा एक भाग म्हणून डॉ. लहानेसाहेब मी तुमची माफी मागतो. केवळ आणि केवळ सामाजासाठीच जगणार्‍यावर ही अशी किटाळं कधी तरी येतात आणि त्याची जखम खुप खोलवर होते याचीही मला कल्पना आहे. या प्रसंगातून आपण नक्कीच सुखरूप बाहेर याल आणि पुन्हा तेजाने चमकाल अशी खात्री आहे. डोळस ‘माणसांना’ तुम्ही हवे अहात.....  खरंच... ते म्हणताहेत:

ते तात्या होते म्हणूनी
मी घोर तमातून तरलो
अंधार्‍या दुनियेमधुनी
मी प्रकाश भरूनी उरलो

ता.क. अंबानीच्या अंबारीत आसनस्त होणं सोडून तुम्ही जनसामान्यांसाठी जे.जे.लाच आपलं केलं याची जाणीव आहे समाजाला.      

आपला हितचिंतक
नरेंद्र प्रभू  

                        

10 February, 2014

म्हणूनच ते 'परदेशी' जातात...!


सत्ता आणि प्रशासनाची चावी ज्यांच्या हाती आहे त्यापैकी प्रामाणिक कोण असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती असताना जनहिताची कामे नेकीने करणार्‍या अधिकार्‍याची बदली करण्यातच धन्यता मानणार्‍या आणि त्यासाठी आपली सगळी आसुरी ताकद पणाला लावणार्‍या राजकारण्यांचीच सद्ध्या चलती आहे. ज्यांनी खरंतर आपल्या वागणूकीने अधिकार्‍यांवर वचक ठेवावा अशी अपेक्षा असते तेच किती खालच्या पातळीवर जावून राजकारणाचा धंदा करीत आहेत ते पिंपरीतील घटनांच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाले. काहितरी चांगलं करून दाखवणार्‍याला आता 'परदेशी' जावं लागणार या देशात काही खरं नाही म्हणूनच ते परदेशी जातात...!  

हल्ली सगळी माध्यमही एका एका राजकारण्याची किंवा त्याची बटीक असणार्‍यांची असताना 'लोकसत्ता'ने मात्र आपला पत्रकारीतेचा वसा प्रामाणिकपणे जपलेला वारंवार पाहायला मिळतो. गिरीश कुबेर संपादक झाल्या पासून या वृत्तपत्रालातर चांगलीच धार आली आहे. आजचा आपण सगळेच परदेशी हा संपादकीय लेख त्याचाच नमुना आहे. 

वाचा :  


पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी वा अन्य कोणा अधिकाऱ्याची बदली हा मुद्दा नाही. परंतु सत्तेची कवचकुंडले आपल्या अंगावरून कधी उतरणारच नाहीत असे काही राजकारण्यांना वाटते किंवा काय, हा प्रश्न आहे. तसा तो असेल तर असे वाटणाऱ्या काही राजकारण्यांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश अग्रक्रमाने करावा लागेल यात शंका नाही. गेले काही दिवस परदेशी यांची बदली हा अजितदादा यांचा एककलमी कार्यक्रम होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अजितहट्ट मान्य केल्याने अजितदादांना आता हायसे वाटले असेल. यापूर्वी नांडेदला जिल्हाधिकारी असताना शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बोगस पटसंख्येची तपासणी करून परदेशी यांनी राजकारण्यांच्या शिक्षण संस्थांनाच सुरुंग लावला होता. पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर त्यांनी तेथील बेकायदा बांधकामे पाडण्याचा धडाका सुरू केला. त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये आणले ते अजितदादांनी. पण हे ऋ ण परदेशी विसरले आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या अनधिकृत बांधकामांना त्यांनी हात घातला. त्यामागील कारण हे की बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पालिका आयुक्तांवर सोपवली आणि ती पार पाडण्यात कसूर झाल्यास अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले. परंतु आपली राजसंस्था ही न्यायसंस्थेच्याही वर आहे असे अजितदादांना वाटत असावे. हे समजून घेण्यात परदेशी अपयशी ठरले. त्यांची चूक एवढीच की त्यांनी पिंपरी चिंचवडचे सर्वेसर्वा असलेल्या अजित पवारांचे आदेश ऐकण्याऐवजी न्यायालयाचे आदेश ऐकायचे ठरवले.   मुंब्रा येथे जशी कायदेशीर बांधकामेच कमी आहेत, तशीच अवस्था पिंपरीचीही आहे. याचे कारण तेथील राजकारण्यांना अजित पवारांच्या पदराआड लपून हा प्रचंड ऊतमात करता आला. पालिकेतील कर्मचाऱ्यांनीही मग बेकायदा बांधकामे करून त्यात आपले हात धुऊन घेतले. अनैतिकांना पाठीशी घालण्याची सवय लागलेल्या अजितदादांनी नगरसेवकांच्या बरोबरीने नगर अधिकाऱ्यांनाही अभय दिले. पिंपरी चिंचवड परिसरात आपला शब्द चालतो, उच्च न्यायालयाचा नव्हे हे दाखवून देण्याची अजितदादांना इतकी घाई की नगर अधिकाऱ्यांची बांधकामे पाडणाऱ्या परदेशी यांनाच 'तुम्हास काय आप पक्षाचे खासदार व्हायचे आहे काय?' असा प्रश्न विचारण्याइतकी बेमुर्वतखोरी ते करू शकले. अजितदादांना परदेशी यांचा इतका राग असायचे कारण काय याचे उत्तर राज्यातील एखादा शून्यबुद्धीही देऊ शकेल. परदेशी यांनी अनेकांच्या पोटापाण्यावर गदा आणली. पालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी परदेशी यांनी केलेल्या विविध प्रयत्नांमुळे आपले महत्त्व कमी होत असल्याची तेथील नगरसेवक आणि आमदारांची तक्रार होती. ती खरीच. कारण इंटरनेटद्वारे तक्रार केल्यास नगरपालिका दखल घेते हे त्यांनी दाखवून दिल्यामुळे त्या भागातील अनेक नगरसेवक वा आमदारांची दुकाने बंद झाली. आपल्या साजिंद्यांच्या पोटास चिमटा बसू लागल्यामुळे अजितदादांना त्या वेदना सहन झाल्या नसाव्यात.

यातून राज्यातील सडलेल्या व्यवस्थेचे दर्शन झाले. जनतेची कामे होत असल्याचा आनंद वाटण्याऐवजी लोकप्रतिनिधींच्या मनात वेदना कसली तर हे नागरिक आता प्रश्न सोडवण्यासाठी आपले उंबरे झिजवत नाहीत ही. आपल्या नगरसेवक, आमदारांच्या या उपासमार वेदनेमुळे अर्थातच अजितदादांसारख्या संवेदनशील नेत्यास कळवळा आला नसता तरच नवल. त्यात पुन्हा येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका. या निवडणुकांत परदेशींसारखा अधिकारी आपल्याला 'मदत' करणार नाही, असा रास्त विश्वास पवार यांना असावा. त्यामुळे आपल्या मर्जीतील व्यक्तीला तेथे बसविण्यासाठी पवार यांनी बदलीचा हा एककलमी कार्यक्रम आखला. 'सरकारला चांगले अधिकारी अनेक ठिकाणी हवे असतात', असे बदलीचे लंगडे समर्थन करणाऱ्या अजित पवार यांनी, मग असे चांगले अधिकारी पिंपरीमध्ये का नको असतात, याचेही उत्तर द्यायला हवे. फक्त परदेशी यांचीच बदली केली तर त्याचा फार बभ्रा होईल, म्हणून राज्यातील अन्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या ऐन फेब्रुवारी महिन्यातच करण्याचा घाट घालण्यात आला आणि निवडणुकीच्या तोंडावर योग्य जागी योग्य माणसे बसवण्याचा हा उद्योग यथासांग पार पडला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही जनहित विसरून अखेर या प्रकरणात शरणागती पत्करावी लागली. अर्थात जनतेचे हित अशी काही कल्पना कोणत्याच राज्यकर्त्यांच्या मनात कधीही नसते हे जरी खरे असले तरी एखाद्याने स्वत:चे हित पाहावे तरी किती हा प्रश्न येतो. 

गेली जवळपास दोन दशके महाराष्ट्राचे राजकारण झपाटय़ाने सडू लागले आहे. एके काळी उत्तम नोकरशाहीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या राज्यातील नोकरशाहीचा आब अलीकडच्या काळात नाहीसा होऊ लागला असून सुरेशदादा जैन, अजितदादा यांच्यासारखे राजकारणी त्यास कारणीभूत आहेत. या प्रकरणातील दुर्दैव हे की इतके सारे होऊनही पिंपरी चिंचवड परिसरातील राजकीय निकालावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही आणि अजितदादांचा किल्ला अभेद्यच राहील. याचे कारण असे की मतदारांत त्यांच्या अनैतिकतेवर पोसलेल्यांचे वा या अनैतिकांना पाठीशी घालणाऱ्यांचे ऋ णी असणाऱ्यांचे प्राबल्य अधिक असल्याने हे सर्व ऋ णवंत परदेशी यांच्या बदलीबद्दल उपमुख्यमंत्र्यांना दुवाच देतील. परंतु यामुळे एका नव्या घातक प्रथेला आपण जन्म देत आहोत, याची या लघुदृष्टी नेत्यांना जाणीव नाही. आपल्या वागण्याने अजितदादा वा तत्सम राजकारणी संदेश देतात तो असा की जी काही सर्व ताकद आहे ती फक्त राजसत्तेत. कोणत्याही समृद्ध लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या प्रशासनास या राज्यात काहीही किंमत नाही, किंमत आहे ती फक्त आणि फक्त सत्ताकारणासच. प्रशासन कितीही नियमाला धरून चालणारे असले तरी कोणतेही नियम सत्ताधाऱ्यांना बांधून ठेवू शकत नाहीत. सबब काहीही-  मग यात प्रकल्पांचा खर्च हवा तितका वाढवणेही आले.. करावयाचे असेल तर सत्ता हवी. भलेबुरे- प्राधान्याने अर्थातच बुरे.. जे काही करावयाचे ते सत्तेसाठीच कारण सत्ता हेच शहाणपण, असा संदेश यातून जातो. परंतु अजित पवार यांच्यासारख्यांच्या हे लक्षात येत नाही की अरविंद केजरीवाल यांच्यासारखे जन्माला येतात ते याच वातावरणामुळे. अलीकडे प्रशासनातील उच्च पदस्थांनी आपापले काम सोडून राजकारणात उडी घेण्याची प्रथा रूढ होताना दिसते. ती तशी होत असेल तर त्यामागील कारण हे असे राजकारणी आहेत. मग ते अबकारी खात्यातील नोकरी सोडून राजकारण करू पाहणारे केजरीवाल असोत वा पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन निवडणुकांच्या मैदानाकडे धाव घेणारे सत्यपाल सिंग वा किरण बेदी. समाजात इतक्या सर्वाना राजकीय तहान लागताना दिसते ती सत्ताकारणामागील अशा अभद्र वर्तनामुळे. प्रशासनात राहून आपण काहीही करू शकत नाही, धनदांडग्यांशी हातमिळवणी असणाऱ्या सत्ताधाऱ्यांपुढे नियमाने वागणाऱ्याचे काहीही चालत नाही. तेव्हा आपण स्वत: याच धनदांडग्यांत सामील होऊन स्वत:चे भले करून घ्यावे अशी गरज नोकरशहांना वाटू लागली असेल तर ते साहजिक म्हणावयास हवे.

हे अधिक धोकादायक आहे आणि त्याची जाणीव व पर्वा अजितदादांसारख्या अनेकांना नाही. सत्ता असेल तर काहीही करता येते. धरणांचा खर्च वाढवता येतो. वाटेल तितका टोल घेता येईल अशी व्यवस्था करता येते. आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांची धन व्हावी यासाठी जनतेच्या पैशाने गरज नसलेली कामेही काढता येतात. आणि हे सर्व गैरव्यवहार झाकता येतील याचीही तजवीज करता येते. तेव्हा शहाणी ठरते ती सत्ता. परिणामी या महाराष्ट्रदेशी नियमांचे पालन करणारे सर्वच परदेशी ठरतात.

07 February, 2014

कैलास-मानसरोवर - भाग तीन


कोदारी, न्यालम, सागा, होरचू, चूई गुंफा आणि दारचेन असा काठमांडू पासून सुरू झालेला मोटार प्रवास आता संपून पायी किंवा घोड्यावरून परिक्रमा करण्याचा दिवस येवून ठेपतो आणि मनात एक आगळीच हुरहुर साठून राहाते. तासा-तासाला, काही वेळा मिनिटागणीक बदलत जाणारं वातावरण. बोचरे अतीशीत वारे, काळंकुट्ट आभाळ आणि  त्या वातावरणाला साजेशी बर्फ वृष्टी या सगळ्याच्या पार्श्वभुमीवर परिक्रमेत आपला तग लागणार का? हा प्रश्न आणि परिक्रमा करायची लागलेली अनिवार ओढ. इथे कस लागतो आपल्या मानसिक तयारीचा आणि आपल्या बरोबर असलेल्या सहलसाथीच्या नेतृत्व गुणांचा. मनाची पुर्ण तयारी करत आपण परिक्रमेसाठी सिद्ध होतो. आणि यमद्वाराकडून पावलं पुढे पडतात ती कैलासाच्या प्रदक्षिणेसाठीच.

यमद्वार मागे टाकून आपण जणू परलोकातच प्रवेश करीत असतो. दमछाक करणारा चढा रस्ता, कोरडं आणि शुष्क वातावरण, उन्हाचा चटका, थंडीचा शहारा, पायांना ओढ पण हे सगळं मागे टाकून मन मात्र पुढेच धावत असतं. त्या विराट रुपाच्या दर्शनासाठी. खरं तर एव्हाना आपणही त्याचाच एक भाग बनलेले असतो. तो निळकंठ, कैलासपती आपल्याला आत सामावून घेत असतो. जय... भोले....! चा नाद निनादत असताना पुन्हा एकदा बळ एकवटून आपण चालत राहातो. वाटेत उमेद वाढवणारं कैलासाचं दर्शन होत राहातं. कधी ते शिखर पर्वतापल्याड गुडूप होतं. असं करत करत पहिल्या दिवसाच्या चालीनंतरचा रात्रीच्या मुक्कामाचा पडाव येतो....दिरापूक. कैलास शिखराचं दर्शन इथे अगदी जवळून होतं. आता त्याच्या आणि आपणामध्ये कुणीच नसतं. त्या अनादी अनंताच्या दर्शनाने मन तृप्त होतं. दिवसभराचा १२ किलोमीटरचा प्रवासाचा शीण पळून जातो आणि दुसर्या दिवशीच्या २२ किलोमीटरच्या प्रवासासाठी मन सज्ज होतं.
दोन रात्री तीन दिवसात पुर्ण होणारी परिक्रमा या मधला महत्वाचा भाग म्हणजे दुसर्या दिवशी असलेला प्रवास. या प्रवासात १८,६०० फुट उंचीवरचा डोलमा पास पार करून जाणं हे फार महत्वाचं आणि त्याचीच चर्चा जास्त होत असते. पाठीवरचं ओझं (हे खुप नसलं तरी तिथे थोडसं वजनही नको होतं), पाण्याची उपयुक्तता, ताकद वाढवणारा सुकामेवा या सर्वांचं महत्व पहिल्याच दिवशी कळतं तसं हातातली आधाराची काठी ही तर जीवन साथीच वाटायला लागते.

दिरापूकचा मुक्काम हलवल्यावर लगेचच डोलमा पासची उंची खुणावू लागते. मजल दरमजल करीत प्रत्येक जण आपल्या ताकदी प्रमाणे अंतर कापत जातो. चहू बाजूला पसरलेला बर्फ आणि आकाशाला गवसणी घालायला निघालेले यात्रेकरू. एका वळणावर ही रांग दिशेनाशी होत होती. प्रत्येकाला तिच जागा खुणावत होती. तोच तो डोलमा पास होता. विजयी वीराप्रमाणे एक एक करत तिथे पोहोचत होते. आपल्या श्रद्धेप्रमाणे पुजा करीत होते. हाच तो यात्रेतला परमोच्च बिंदू. थोडा वेळ थांबून यात्री उताराला लागतात तोच समोर खाली गौरी कुंडाच दर्शन घडतं. इथेच गणेशाच जन्मस्थान असल्याच मानलं जातं. पुराणात वाचलेली ठिकाणं प्रत्यक्ष पाहताना मन उल्हसित होतं. आता त्या खिंडीतून उताराला लागलेले यात्रेकरू महत्वाचा टप्पा पार केल्याच्या आनंदात आणि बाजी मारल्याच्या ऎटीत मार्गक्रमण करीत जातात. पुन्हा कैलासाच दर्शन होतं. हात आपसूकच जोडले जातात. संध्याकाळपर्यंत लांबलेला प्रवास झुथूलपूक या गावात संपतो. आजचा पडाव इथेच. यात्रेतला महत्वाचा भाग पार पडल्याने सर्वांचीच कृतकृत्य झाल्याची भावना असते.

तिसर्या दिवशीचा आठ किलोमीटरचा प्रवास हा परिक्रमा पुर्ण होणार या आनंदातच सोपा वाटू लागतो. प्रवासादरम्यानची बर्फवृष्टी, पाऊस यांची तमा बाळगता आणि आधीच केलेल्या पुर्ण तयारीमुळे हा प्रवासही सुखरूप पार पडतो. पुन्हा लांबून मानसरोवराचं दर्शन होतं. परिक्रमेच्या आधी तिथे केलेलं होम हवन आठवतं. मंडळी परतीच्या प्रवासाला लागतात. काही लोकांना वाटतं की माणसं असा खडतर प्रवास का करतात? त्याच उत्तर म्हणून एक प्रश्नच विचारावा लागेल की गिर्यारोहक एव्हरेस्ट का चढतात? किंवा विक्रमवीर नायगारा का ओलांडतात? मित्रहो यालाच जगणं म्हणावं नाही का? अशा ठिकाणी गेल्यावर जगण्यातली मजा आणखी वाढते आणि उर्वरीत आयुष्याला ही काही अर्थ प्राप्त होतो. आज आपल्या घरी दारी ज्या सोयी सुविधा हात जोडून उभ्या असतात त्याचं एरवी आपल्याला काहीच कौतूक वाटत नसतं पण अशा ठिकाणी प्रवास करून आल्यावर आपणाला आपण किती आरामदायी जीवन जगत असतो याचा साक्षात्कार होतो.  या अशाच प्रवासांमधून आपण जगण्याची कला शिकत असतो. त्या विराट दर्शनाने आपलं मनही विशाल होतं. जगण्याचा दृष्टीकोन बदलून जातो
    





05 February, 2014

कैलास-मानसरोवर - भाग दोन


नेपाळ मध्ये दाखल झाल्यावर तिथल्या पशुपतीनाथासह अनेक उत्तम आणि प्राचिन मंदीरांचा परिसर फिरून पाहताना यात्रेला जाण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती होते आणि पावलं आपसूकच मानसरोवरला प्रस्थान करण्यासाठी उतावीळ होतात. काठमांडू शहर सोडल्यावर लगेचच हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटत आपला प्रवास सुरू होतो. मनोहारी धबधबे आणि नदीचा खळखळता प्रवाह याचा रम्य देखावा पाहात हा प्रवास काही ठिकाणी रस्ता खराब असला तरी सुखद होतो. काठमांडू शहरापासून जस जसे आपण दूर येवू लागतो तसतशी थंडी आपली जाणीव करून देवू लागते. काठमांडूपासून रस्ते मार्गाने कोदारी या नेपाळ-तिबेटच्या सीमेलगतच्या गावात गेल्यावर पारपत्र आणि प्रवेश विषयक बाबींची पुर्तता केल्यावर आपण तिबेटमध्ये येवून दाखल होतो. तिबेटमधले रस्ते हिमालयातले असूनही उत्तम असल्याने पुढचा प्रवास चांगला होतो आणि गाडी बाहेरच्या देखाव्यांचा आनंद मनोसोक्त लुटता येतो. घनदाट पर्वतराजींमधून नागमोडी वळणं घेत जाणारे रस्ते, खळाळते प्रवाह, आल्हाददायक हवा, बौद्ध धर्मियांनी ठिकठिकाणी बांघलेल्या प्रार्थनेच्या पताका या सर्वांचं धावतं दर्श घेत गाडी तिबेटच्या निर्जन प्रदेशातून जात असते आणि क्षितिजापर्यंत पसरलेला पठारी प्रदेश सुरू होतो. आता झाडा-झुडुपांची दाटी कमी होते आणि थोडासा वैराण प्रदेश सुरू होतो. हवेतला गारवा वाढतच जातो आणि त्याच बरोबर समुद्र सपाटीपासून वाढत जाणारी उंची आपण एका वेगळ्याच प्रदेशात आल्याची आपणाला जाणीव करून देते. सुर्य कलतीला जात असतानाच आपलं मुक्कामाचं गाव येतं, मंडळी गाड्यांमधून पाय उतार होतात, वाफाळता चहा आणि शेरपा लोकांच आतिथ्य याची मजा घेताना प्रसन्न मोकळ्या हवेत दिवसभराच्या प्रवासाचा शीण नगण्यच वाटतो.

मानसरोवरला १५,६०० फुटांच्या उंचीवर जाण्याआधी वाटेतल्या एखाद्या गावात एखादी टेकडी चढण्याचा सराव केल्यास आपल्याला आपली क्षमता कळते शिवाय अशा उंचीवर वावरण्याची सवयही होवून जाते. मानसरोवरच्या पुढे कैलासची परिक्रमा करण्यासाठी अशा सरावाचा नक्कीच फायदा होतो आणि या भागात कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी त्याची उजळणी होते.

तिबेटमधल्या डोंगराळ आणि मागास भागातून आपला प्रवास सूरू असला तरी निसर्ग आणि बदलत जाणारा प्रदेश पाहात असताना मानसरोवरला पोहोचण्याची ओढ आणखीच वाढत जाते. निसर्गाच्या अफाट आणि बदलत्या रुपाने आपली जिज्ञासा वाढीस लागते. आपलं धावणारं वाहन, वाटेत लागणार एखादं छोटसं गाव आणि मेंढ्या हाकणारे मेंढपाळ एवढाच काय तो चर सृष्टीचा संपर्क, बाकी सगळा कॅनव्हास चित्रवत वाटावा असाच. मुक्कामाचं ठिकाणही नेहमी पेक्षा वेगळं, चार भिंती आणि झोपण्या-जेवण्याची सोय. आधुनिक युगापासून चार पावलं दूर असण्यातली मजा इथेच अनुभवावी. सर्व अध्ययावत सोयी-सुविधांपासून वंचित असणारी ही ठिकाणं आपलं लक्ष कैलासकडे केंद्रित करण्यासाठी आवश्यकच असतात. सभोवताली विशाल पसरलेला निसर्ग अनुभवत असताना आपसूकच मन विरक्त होत जातं.


मैलोनमैल पसरलेला प्रदेश न्याहाळत असतानाच अचानक मानसरोवराची पहिली झलक नजरेस पडते आणि आजवर केलेल्या तपश्चर्येचं फळ मिळाल्याचा आगळाच आनंद नसानसातून प्रवाहीत व्हायला लागतो. मग तो क्षण जवळ येतो, मानसरोवरच्या काठी आपण उभे असतो, समोर दूरवर पसरलेलं निळ्याशार जलाने भरून वाहणारं मानसरोवर. सुर्यप्रकाशात चमचम करणारं पाणी, त्याचे बदलते रंग, अंगावर रोमांचं उभा करणारा गार-गार स्पर्श, पवित्र तीर्थाची याचीदेही याची डोळा झालेली पहिली वहिली भेट. आकाशातले अनंत रंग, पिंजारलेल्या ढगांच्या क्षणाक्षणाला बदलत जाणार्या आकृती आणि त्या सर्वांसमोर उभं असणारं साक्षात कैलास शिखर. हे जसं बाहेर तसाच मनात उचंबळून आलेला भावभावनांचा कल्लोळ. अतिव प्रेमाने सहलसाथींची घेतलेली गळाभेट. एका दर्शनाने सारं कसं क्षणात बदलून जातं. सारा शीण, सारा भार सत्वर नाहीसा होतो, मन भारावून जातं. आपण भानावर येतो तेव्हा आता एकच ध्यास लागलेला असतो तो कैलासाच्या परिक्रमेचा. मानसरोवरच्या दर्शनाने पावन झालेलं मन-शरीर आता त्या एकाच विचाराने प्रेरीत झालेलं असतं. परिक्रमा.....! परिक्रमा.....! 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates