28 August, 2011

एक ठिणगी पडली आहे...!




गेली ४२ वर्ष जे कुठल्याही सरकारने केलं नाही आणि लोकपाल बिल योग्यरित्या आणण्याचा ह्या सरकारचाही मानस नव्हता ते बिल आता येऊ घातलय. तमाम राजकारण्यांनी ज्या अण्णांना हिणवण्यातच धन्यता मानली त्या सर्वांचा मुखभंग झाला आहे. अनिच्छेने का होईना सर्वच्या सर्व राजकारण्यांना लोकसभेत अण्णांसमोर नतमस्तक व्हावं लागलं. अण्णानी उपोषण सोडलं पण ते सोडताना हा अर्धा विजय आहे असं सांगायला ते विसरले नाहीत. अजून लढाई बाकी आहे. भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देऊ नका असं आवाहन करण्यासाठी ते देशव्यापी दौरा करणार आहेत. गेले बारा-तेरा दिवस संपुर्ण देशातून जो प्रतिसाद अण्णाना मिळाला तो पाहाता नव्या बदलाची सुरुवात होत आहे.... लोकशाहीचे वाली म्हणवणारे वाली-सुग्रीवासारखे भांडत आहेत, ते दूर होतील आणि २०१४ साली कदाचीत नवी पहाट होईल. आत्तातर सुरुवात झाली आहे. समाजालाच जर भ्रष्टाचार नको असेल तर तो नाहीसा व्हायला किती वेळ लागणार? एक ठिणगी पडली आहे... त्याचा वणवा नक्कीच होईल .   

16 August, 2011

एक अण्णा, ...हजारो, ...लाखो ...कोटयावधी हजारे....!



 
शेवटी केंद्र सरकरने अण्णाना अटक केली. पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या म्हणण्या प्रमाणे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची, त्यांच्याशी अण्णांनी बोलावं. पोलिसांच्या अटी मान्य कराव्यात, यात लक्ष घालणं आपलं काम नाही. हो ते बरोबरच आहे म्हणा. पंतप्रधानांचं कशावरच नियंत्रण नाही. ना पक्षावर, ना मंत्र्यांवर, ना महागाईवर, ना अतिरेक्यांवर. एक पंतप्रधानांचं मौन सोडलं तर बाकी सगळे वाचाळ मंत्री आणि तथाकथीत नेते अण्णांवर तोंडसुख घेताहेत. मग्रूर कपिल सिब्बल, मनिष तिवारी, दिग्विजयसिंह सगळे धादांत खोटं बोलताहेत.

हुरियत कॉन्फरंसच्या नेत्यांना दिल्लीत येऊन देश विरोधी भडकावू भाषणं करण्याची मुभा दिली जाते. उलट त्यांना पोलिस संरक्षण दिलं जातं. ज्यांना सर्वोच्य न्यायालयाने फाशी सुनावली आहे अश्यांना वर्षोंवर्षे चोबाळलं जातं आणि अअण्णांसारख्या सत्याग्रहीला तिहार जेल मध्ये पाठवलं जातं, जिथे कलमाडी, राजा सारखे बदमाश  अटकेत आहेत. आणखी काही भ्रष्टाचारी बाहेर आहेत त्यांना वाचवण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू आहे. न पेक्षा आत्ता जे आत आहेत त्याना तिथे पाठवण्यासाठी सरकारने एवढा वेळा लावला नसता. खरंतर न्यायालयानेच हस्तक्षेप करून कलमाडीसारख्याना आतं डांबलं आहे.

एक अण्णा जुलमाने पकडले गेले तरी बाहेर लाखो, कदाचीत कोटयावधी रस्त्यावर येतील हिच अण्णांची खरी ताकद आहे. 


ता.क. हे पोष्ट लिहिल्यानंतर डॉ. रविन थत्ते याचे विचार थिंक महाराष्ट्र वर वाचले, ते खालिल प्रमाणे.

सरकारचे डोके (!)
-  डॉ. रविन थत्‍ते
     स्‍वातंत्र्यूपर्व काळात लोकमान्‍य टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. आजच्‍या सगळ्या घडामोडींना हा अग्रलेख चपखल बसेल. मला असे वाटते, की हे सरकार कपिल सिब्‍बल आणि मनीष तिवारीसारख्‍या धटिंगणांच्‍या हातात गेले आहे. दिग्विजय सिंह तर वेडाच आहे! मनमोहनसिंह हतबल, सोनिया गांधी आजारी, राहुल गांधी निष्‍प्रभ आणि मुखर्जी व चिदंबरम वेड पांघरून पेडगावला गेले आहेत. अण्‍णा हजारे यांना झालेल्‍या या अटकेतून काहीतरी चांगलेच निष्‍पन्‍न होईल असा माझा विश्‍वास आहे. मात्र वर्तमान परिस्थिती पाहिल्‍यानंतर आपल्‍यात आणि इजिप्‍तमध्‍ये किंवा सिरियामध्‍ये काय फरक उरला हेच समजेनासे झाले आहे?
डॉ.रविन थत्‍तेप्‍लास्टिक सर्जन, भ्रमणध्वनी: 9820523616
                    

12 August, 2011

मनमोहन हा साजरा श्रावण



वन पाचूचे, बन पाचूचे
हिरवी झाली धरती
दुथडी भरून वाहे गंगा
आकाशाला भरती

गहिवरले ढग, मोहरले जग
आनंदा ना गणती
दाही दिशांचे पालटले रुप
चहूबाजू या सजती

इंद्रधनूचा खेळ साजरा
कितीक रंगांचा नजारा
नाद खळाळत वाहतो झरा
धबधब्यांच्या धवल धारा

दरी दरीतून गार वारा
लयीत नाचे पिक शिवारा
क्षणात होतो वरून मारा
सुखवून जाई गाय-वासरा

रानफुलांची मखमल सजली
फुलपाखरे नाचू लागली
पक्षीगणांची किलबिल झाली
हर्षभराने धरा नाहली

मंदिरातला नाद सुमधूर
भरून राहे ललनांचा स्वर
मंजूळ पावा वाजे दूरवर
जुळून आले सारे हे सुर

मनमोहन हा साजरा श्रावण
तजेल्यात ह्या नाचे तनमन
पाचूचे वन, पाचूचे बन
आनंदाची झाली पखरण 


 नरेंद्र प्रभू 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates