25 May, 2010

द म्युझिशियन – अमर ओक


बासरी म्हटलं की श्रीकृष्ण आणि कृष्ण म्हटलं की बासरी हे समिकरण ठरुन गेलेलं आहे. म्हणजे किमान द्वापारयुगापासून त्या बासरीने सर्वानाच मोहित केलं आहे. बांबूचा एक तुकडा आणि त्याला पाडलेली सहा भोकं, पण ती बालक़ृष्णाच्या ओठांना लागली की मग गोप-गोपीं बरोबर गायी-वासरंही त्याच्या भोवती गोळा होत, सर्वजण त्या अपुर्व सुरांनी मोहित होत असत आणि म्हणूनच कृष्णाचं एक नाव मनमोहन पडलं असावं. सद्ध्या असाच एक मनमोहन आपल्या बासरीच्या सुरावटी द्वारे उभ्या महाराष्ट्राला गुंग करून टाकत आहे. म्हणूनच अमर ओक म्हटलं की ते बासरीवाले का? असा प्रश्न विचारला जातो. या ब्लॉगवर  'द म्युझिशियन्स' पन्नासावा प्रयो   या  पोस्टवर आलेली एक प्रतिक्रियाच बघाना फार बोलकी आहे  वाचक म्हणतात बहुतांश नवीन कलाकारांची कला मला उथळ वाटते; एका उत्तम सतारवादकानीही माझ्याशी बोलताना आधीच्या कलाकारांची कला फार उच्च पातळीवरची होती आणि तशी विविधता आणि खोली संगीतात आणणं कठीण आहे, अशी कबुली दिली होती. अमर ओक हा एक कलाकार मात्र याला अपवाद आहे.  अमर ओकांबद्‌दल मात्र हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की ते दुसरे हरिप्रसादच आहेत. आणि ते खरंच आहे. त्यांच्या बासरीत जादू आहे. बासरीचा सर्वोत्कृष्ट वापर करणार्‍या हृदयनाथसारख्या संगीतकाराकडून ओकांना पावती मिळाली, याचा मला आनन्द झाला. मुख्य म्हणजे ओक संगीताचे तुकडे आहेत तसे वाज़वतात. स्वत:चं प्रभुत्व दाखवण्याची अनावश्यक धडपड, विचित्र कपडे, बोलताना मर्कट हातवारे वगैरे चाळे ते करत नाहीत. चौरसियांचे अत्यन्त कठीण असे एकदोन तुकडे वाज़वताना ओकांची ज़रा गडबड झाली, पण तो दोष अगदीच किरकोळ आहे. त्यांच्या कलेचं चीज़ करणारी नवीन गाणी आज़ कोणीही रचू शकत नाही हे ओकांचं दुर्दैव.हृदयनाथसारखा संगीतकार ओकांना मिळायला हवा होता." 

एखाद्या कलेशी जेव्हा तो कलाकार एकरूप होऊन जातो तेव्हा ती कला त्याला वश होते. अमर ओकांची बासरी त्यांना अशीच वश झालेली आहे. चुरा लिया है किंवा गोरी तेरा गाव बडा प्यारा हे गाणं जेव्हा आपण अमरच्या बासरीमधून ऎकतो तेव्हा आपण थक्क होऊन जातो. म्हणूनच टाइम्स मुझिक सारख्या कंपनीने प्यार मोहब्बत ही अमर ओकनी वाजवलेल्या बासरीची सिडी बाजारात आणली आहे. झि मराठीच्या सारेगमप मध्ये जेव्हा ही बासरी वाजते तेव्हा बर्‍याच वेळा अख्खा पडदाच अमर ओकने व्यापलेला असतो. समोर कोणतीही महनीय व्यक्ती परिक्षक म्हणून असो अमर ओकच्या बासरीला दाद मिळाली नाही असं कधी होत नाही. द म्युझिशियन्स् या वाद्य मैफिलीत सावन का महिना असो की कही दूर जब दिन ढल जाये असो समोरचे प्रेक्षक भाराऊन जातात आणि उभे राहून मानवंदना देतात. एवढं असलं तरी अशा या गुणी कलाकाराचे पाय जमिनीवरच आहेत. बासरीच्या सहा छिद्रांवाटे काम, क्रोध, मद, मत्सर आदी षड्-रिपू आपल्यातून निघून जातात असं ते म्हणतात ते खरं असावं. ऎकणार्‍याला सुद्धा जो अलौकीक आनंद मिळतो त्याला तोड नाही. ती सुरावट ऎकतच रहावी असं वाटत रहातं, ती बासरी बस रे असं कधी वाटतच नाही.     
         

ए पब्लिक है, सब जानती है


या पुढे रत्नागिरी टिळकांची नव्हे तर नरेंद्र महाराजांची भूमी म्हणून ओळखली जाईल इती भास्कर जाधव ही बातमी वाचून हसावं का रडावं तेच समजेना. कोण हे नरेंद्र महाराज? ज्याला लोकमान्य टिळकांच्या जागी बसवायला जाधव निघालेत. काही वर्षांपुर्वी एक सामान्य ग्रामसेवक असलेला, सामान्य वकुबाचा माणूस स्वतःला स्वतःच शेंदूर फासून देव होवू पहातोय. अगोदर दगडाला शेंदूर फासला जात होता तिथपर्यंत ठिक होतं, तो दगड स्वतः उठून कुणाला नादी लावत नव्हता. अशा प्रकाराना रोखायचं सोडून आजचे राजकारणी त्यांची पाद्यपुजा करतना दिसताहेत. हेच ते महाराज ज्यानी आपल्या हातातली काठी खांद्यावर घेऊन उत्तरप्रदेशात विमानात प्रवेश करण्याचा हट्ट धरला होता आणि सुरक्षा यंत्रणेने मज्जाव करताच मुंबईत त्याच्या बगलबच्च्यांनी विमानतळावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आपल्या काठीचा प्रसाद दिल्यावर त्याची पांगापांग झाली हा भाग वेगळा.

गर्दी दिसली की लगेच हात धूऊन घ्यायची आजच्या फुढार्‍यांना एवढी घाई झालेली असते की विचारता सोय नाही. त्या नरेंद्र महाराज्याने जमवलेल्या गर्दीला भुलून जाधव, तोगडीया अशी भुतावळ तिकडे गेली आणि मग तोंडाला येईल ते बोलली. त्यांचं सुद्धा बरोबरच आहे. ज्या सरकारात जाधव आहेत त्याचे म्होरकेच जर वर्षावर जाहीरपणे सत्य साईबाबाची पाद्य पुजा करतात, मग एखाद्या राज्य मंत्र्याने नरेंद्र महाराजाचे पाय  धरले तर सामान्यांनी बघायचं तरी कुणाच्या तोंडाकडे?

पण मुळ मुद्दा वेगळाच आहे. या राजकारण्यांची वक्र दृष्टी आता महाराष्ट्रातल्या लक्षावधी देवळांकडे, नव्हे नव्हे त्यांच्या सपत्तीकडे वळलेली आहे. त्याचच हे मार्केटींग असावं. पण त्यासाठी आमच्या श्रध्दा स्थानांना हात लावायचा कुणालाच अधिकार नाही. काय सांगाव? उद्या छत्रपती शिवाजी महराजांचा महाराष्ट्र तुम्ही अशाच एखाद्या बाबाला आंदण द्याल हो..... हे कसं चालऊन घ्यायचं? अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक बासनात गुंडाळून ठेवणारं हे सरकार अंधश्रद्धेला खतपाणी घालायला निघालय. घाला, सध्या मुजोरांची चलती आहे, पण एक लक्षात घ्या, जनता वेडी नाही, ए पब्लिक है भाई, सब जानती है।     

22 May, 2010

अखेर टिंग्याला घर मिळाले



टिंग्या हा चित्रपट अवघ्या मराठी मनाला भावला, महाराष्ट्राला आवडला. या चित्रपटाचा नायक टिंग्या मात्र वास्तवात चित्रपटात दाखवला आहे त्याहून अधिक हालाखीच्या परिस्थितीत दिवस कंठत होता. चित्रपट पुर्ण झाल्यावर आणि तो प्रदर्शीत झाल्यावर लोकांच्या नजरा टिंग्याकडे म्हणजे शरद गोयेकर कडे वळल्या, त्याला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला. अनेक राजकारण्यांनी त्याला लाखोंच्या देणग्या जाहिर केल्या. हे राजकारणी महा कावेबाज, देणग्या जाहिर करतात पण देत मात्र नाहीत. अजून जाहिर झालेल्यापैकी काही दोणग्या टिंग्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत.

 
चित्रपटात टिंग्या एका झोपडीवजा घरात राहतो असं दाखवलं आहे. पण वास्तवात शरद गोयेकर पालावर रहात होता. गेल्या वर्षी आपल्या मायबाप सरकारने त्याला उदार होऊन दोन गुंठे जमीन दिली. (इकडे रसकार मधलेच काही मंत्री आणि आमदार घर घर करत फिरत असताना त्या शरद गोयेकरला कोण देणार घर?). या ब्लॉगवरून राजकारण्यांवर सतत टिका होत असते पण आज राजकिय नेता असलेल्या राज ठाकरेंच कौतुक करावसं वाटतं. त्यांनी टिंग्याची अडचण दूर केली. राज ठाकरेंनी टिंग्याला घर बांधून देण्याची घोषणा केली. आमदार शिशिर शिंदेंना त्याची जबाबदरी सोपवली. आठ महिन्यांच्याआत सिमेंट कॉंक्रीटचं पक्क घर बांधून तयार झालं. आज ते आठशे चौरस फूटाचं टुमदार घर शरद गोयोकरच्या हवाली करण्यासाठी खुद्द राज ठाकरे राजुरी (ता. जुन्नर) येथे गेले आहेत. हे एकीकडे आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटी प्रतिज्ञापत्रं सादर करून घर लाटणार्‍या मंत्र्यांना  आणि आमदाराना घराच्या चाव्या द्यायला निघाले होते. आता सुद्धा त्या प्रकरणाची चौकशी न करता ती घर त्याच मंत्र्याना देण्याचं घाटत आहे. अशी ही घर काळजाला घरं पाडतात.  एकी कडे करूणेने आणि दुसर्‍या बाजूला रागाने.   
                

द म्युझिशियन – महेश खानोलकर




हिंदी मराठी मधला कोणताही महत्वाचा सगींताचा जलसा असो व्हायोलिनवर साथ द्यातला हमखास महेशदा असणार हे आता ठरून गेलं आहे. अशोक हांडे यांच्या मंगल गाणी दंगल गाणी पासून माराठी बाणा, अमृत लता पर्यंत सगळ्या वाद्यवृंदांचे संगीत संयोजक महेशदा आहेत. वयाच्या चौथ्या वर्षापासून पं.जीयालाल वसंत यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे गिरवले. द म्युझिशियन्समध्ये त्यांना मास्तर म्हणून मान आहे. केव्हातरी पहाटे या नाटकाला आणि गुलमोहर या हिंदी चित्रपटाला त्यांनी संगीत दिल असून अनेक अल्बम्स् ना संगीत दिलं आहे. त्यांचे श्रावणात घननिळा.. आणि मेरा साया.. हे बोलणार्‍या व्हायोलिनचे अल्बम्स् रसिकांच्या पसंतीला उतरलेले आहेतच.

द म्युझिशियन्समध्ये भेटी लागी जिवा.. जेव्हा ते वाजवतात तेव्हा त्या गाण्याची आर्तता हृदयाला भिडते. रेकॉर्डेड ट्रॅक बरोबर ते जेव्हा व्हायोलिन वर बो फिरवतात तेव्हा त्यात काना मात्रेचाही फरक नसतो. ही जादू ते करतात म्हणूनच त्यांना मॅजिशियन म्हटलं जातं. गोरी गोरी पान या बालगीतातले तिला दोन थापा, तुला साखरेचा पापा या ओळी वाजवतात तेव्हा थक्क व्हायला होतं. तीच गोष्ट सावन का महिना मधल्या अरे बाबा... शोर नही.. सोsss ची. स्वरलिन या अनोख्या वाद्या वर  ते तारशहनाई आणि सारंगीचे स्वर काढतात ते सुद्धा ऎकत रहावे असे. मेरा साया.. मधले आपके नजरों ने समझा पासून मेरा साया साथ होगा पर्यंत सगळे सूर साज ऎकत रहावे असेच.

सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या श्रीनिवास खळे संगीत रजनी या कार्यक्रमात महेशदा १९९० पासून व्हायोलिनची साथ देत आहेत. त्यांचं व्हायोलिन वादन खळेसाहेबांना एवढं आवडतं की ते महेशदाना म्हणाले माझी गाणी तू न्हायोलिनवर वाजव. श्रावणात घननिळा हा अल्बम त्याचीच फलश्रृती आहे. खळेसाहेबांसारख्या संगीतकाराने त्याना दिलेला हा बहूमानच आहे. सद्ध्याच्या युगात अशी संगीताची साधना करणारा कलावंत विरळाच.                 

           

20 May, 2010

'द म्युझिशियन्स' पन्नासावा प्रयोग



रसिकांना कार्यक्रम आपला वाटतो असं काही कार्यक्रमांना भाग्य लाभतं द म्युझिशियन्स हा त्या मधलाच एक प्रयोग आहे. अगदी एन्ट्री पासूनच हा उत्साह जाणवत होता. दिनानाथच्या दारातच परिचीत मंडळी भेटली. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उत्सुकता दिसत होती. सिने-नाट्य क्षेत्रातील ओळखीचे चेहरे पाहून ती आणखी ताणली गेली. गायीन सूर सुरेल नवेच्या तालावर पडदा बाजूला झाला आणि त्या मॅजिशियन्स् नी जो रसिकांचा ताबा घेतला तो अखेर पर्यंत कायम होता. या वादकांनी प्रथम तुला वंदितो ने सुरवात केली आणि शेवटी रसिक त्यांच्या कलेला वंदन करूनच गेला. ओळख करून देताना, पुष्कर श्रोत्री या कलाकारांना संत (संगीतातले तज्ज्ञ) म्हाणाले ते मनोमन पटलं. प्रयोग जसजसा पुढे सरकत होता तसतशी त्याची ती ओळखही सार्थ ठरत होती. समोरच्या पहिल्याच रांगेत अनिल मोहीले, अशोक पत्कीं सारखे संगीतकार बसले होते आणि ते ज्या प्रकारे दाद देत ते पाहून माझ्यासारख्याला हा मणीकांचन योग जमून आल्याचा आनंद होत होता. हे दाद देणं संगीताच्या जाणकारांचं होतं, गुरूंचं होतं. सारेगमपच्या तार्‍यांच्या पर्वात आपल्या सुरेल आवाजात गाणारे आणि इतर वेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवणारे सुमित राघवन, प्रसाद ओक, सुनिल बर्वे, सिमा देशमुख ज्या तन्मयतेने ऎकत होते आणि दाद देत होते त्याला काही तोडच नाही. किमान तीन वेळा तरी या मंडळीनी उभं राहून दाद दिली. त्यांच्या बरोबर कौतुकाची टाळी द्यायला गुरू ठाकूर, अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर सुद्धा होते. प्रदिप वेलणकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत यांच्या जोडीने अनेक प्रसिद्ध कलावंत कार्यक्रमाची मजा लुटत होते. कायदेतज्ज्ञ उज्वल निकम आणि केसरी टुर्स चे केसरीभाऊ पाटील शेवटपर्यंत प्रेक्षागृहात होते. संजू महाडीक आणि विनायक दाबकेंना भेतायला पण खुप मजा आली.

गोरी गोरी पान, मायेच्या हळव्या, पल पल दिलके पास, तु जहा जहा चलेगा, चुरालिया है तुमने जे दिलको, होटो पे ऎसी बात, सुरमयी अखियोंमे, मोगरा फुलला, कजरा मोहब्बतवाला, आभाळमाया आणि मालगुडी डेज् चं टायटल म्युझिक, नटरंग ची लावणी, निलेशची ढोलकी, सत्यजितचं अँकॉर्डीयन आणि पियानिका, महेश खानोलकरांचं व्हायोलीन,  अमर ओकच्या बासर्‍या, आर्चिस लेलेंचा तबला तीन तास कानानी तृप्ती म्हणजे काय ते अनुभवलं. व्हायोलिन, बासरी, किबोर्ड, अँकॉर्डीयन, तबला, ढोलक, ढोलकी, ड्रमसेट, ऑक्टोपॅड, घुंगरू, गिटार या वाद्यांबरोबरच  स्वरलीन, पियानिका, जेम्बे, मादल, ही नेहमी बघायला न मिळणारी वाद्य बघायला आणि ऎकायला मिळाली. तसचं बाटली (काचेची बाटली), पॉलिश पेपर यांचा वापर वाद्य म्हणून करता येतो हेही समजलं. एकूण काय हे लोक खरच स्वरांचे जादुगार आहेत. संगीतातले ज्ज्ञ म्हणजेच संत आहेत हे पुष्कर श्रोत्रींचं म्हणणं एकदम पटलं. गायक कलाकार मिलिंद इंगळे  यांची प्रतिक्रीया वाचण्यासाठी इथे क्लिक करा   या प्रत्येक कलाकारावर वेगळं पोस्ट लिहावं लागेल  तो पर्यंत सा....रे... ग... म... प...              

ता.क.: सुप्रसिद्ध छायाचित्रकार श्री. गौतम राजाध्यक्ष यांच्या चेहरे या पुस्तकाचा अनावरण सोहळा लवकरच होणार असून, त्या पुस्तकात ज्यांचे चेहरे (फोटो) आहेत त्यांच्या समोर हेच वादक कलाकार त्या चेहर्‍य़ांनी गायिलेली, पडद्यावर सादर केलेली गाणी वाजवणार आहेत. ते चेहरे आहेत: लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऎश्वर्या बच्चन, रेखा इत्यादी.  
                   


19 May, 2010

द म्युझिशियन्स सा रे ग म प


संगीताने आपलं जीवन किती सुरस बनवलय. गाता गळा आणि फुललेला मळा ही तर निसर्गाचीच देणगी. एखादी सुंदर तान ऎकताक्षणी वाह...! क्या बात है....!  असे उद्गार नकळत बाहेर येतात. पण या गाण्याला जर संगीताची साथ नसेल तर......? तर ते गाणं तेवढं सुश्राव्य नक्कीच होणार नाही. किंबहूना गाणार्‍यालाही वाद्यांची साथसंगत खुप महत्वाची असते. सुरातालात गाणं सादर करण्यासाठी हे वादक कलाकार किती महत्वाचे असतात हे झि मराठीच्या सा रे ग म प च्या कलाकारांपासून ते पं. सुरेश वाडकर, वैशाली सामंत, अवधुत गुप्ते आणि संगीतकार अजय अतुल डॉ. सलील कुल्कर्णी हेच जास्त चांगलं सांगू शकतील. झि मराठीवर सा रे ग म प सुरू झाल्यापासून जे वादक कलाकार साथसंगत करीत आहेत त्यांनी सगीत क्षेत्रातील दिग्गजांची तर वाहवा मिळवली आहेच पण ते आपल्या कलेच्या जोरावर अवघ्या मराठीमनावर अधिराज्य गाजवत आहेत आणि आज मराठी माणसाच्या घराघरात पोहोचले आहेत.

 हे झि  सा रे ग म प चे गुणी कलावंत द म्युझिशियन्स ही वाद्यमैफल गेले काही दिवस रसिकांसाठी सादर करीत आहेत. आल्पावधीतच या कार्यक्रमाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग आज पार्ल्याच्या मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सादर होत आहे. महेश खानोलकर (व्हायोलिन), अमर ओक (बासरी), सत्यजित प्रभू (किबोर्ड,अँकॉर्डीयन, पियानिका), आर्चिस लेले (तबला), निलेश परब (ढोलक, ढोलकी, जेम्बे), दत्ता तावडे (ड्रमसेट, ऑक्टोपॅड) असे एकापेक्षा एक मातब्बर वादक असून पुष्क़र श्रोत्री यांच्या निवेदनाने कार्यक्रमला अधिकच बहार येईल. या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग मी पाहिला आहेच. आज हा पन्नासावा प्रयोग पाहिन आणि नंतर या प्रत्येक कलाकारावर पोस्ट लिहिन म्हणतो. तो पर्यंत सा....रे... ग... म... प...              

17 May, 2010

गंगोत्री











काल अक्षय तृतीयेला गंगोत्री यमुनोत्रीची कपाट उघडली म्हणजेच ही मंदीरं भाविकांना दर्शनासाठी खुली झाली. हे ऎकतानाच माझ्या मनात गतवर्षीच्या आठवणी जाग्या झाल्या. गेल्यावर्षी जुन महिन्यात माझे मित्र विजय मुडशिंगीकर (गंगाजल नॅचर फाउंडेशन चे अध्यक्ष) आणि मी गंगोत्रीला गेलो होतो. मे महिन्यातला उकाडा जाणवू लागला की मला प्रत्येक उन्हाळ्यात हिमालयाची शिखरं साद घालू लागतात. तुम्ही एकदा हिमालयात गेलात की मग तो तुमच्यावर असं काही गारूड करतो की फिरायला निघायचं म्हटलं की आपल्याला हिमालयच आठवतो. संपुर्ण जगातल्या पर्यटकाना तो आकृष्ट करत असतो. आपण भारतवासी एवढे नशीबावान की हिमालय आपल्या इतक्या जवळ आहे. तर उत्तरकाशीला जाईपर्यंत हवा गरमच होती. उत्तरकाशीहून गंगोत्रीला निघालो आणि काही वेळातच हवेत गारवा जाणवायला लागला. अरूंद रस्ता एकाबाजूला उंचच उंच पर्वत आणि दुसर्‍या बाजूला खोल खोल दर्‍या मध्येच आपलं पवित्र दर्शन देणारी भागिरथी (गंगा नदीला त्या भागात भागिरथी म्हणतात.) चिड आणि पाईनचे डेरेदार वृक्ष, समोरचं विलोभनीय दृष्य न्याहाळत आमचा प्रवास सुरू होता. हर्षीलला नदीचं पात्र अगदी जवळून दिसलं. हिच ती गंगा नदी, गंगेच्या उगमाच्या दिशेने आम्ही चाललो होतो. मनात अनेक भाव-भावनांनी गर्दी केली होती. अतिशय शुद्ध हवा आणि निर्मळ वातावरण. गंगोत्रीला पोहोचलो तेव्हा दिवेलागण झाली होती. गंगोत्री मंदीर, आजूबाजूच्या मठ, मंदीर, आश्रमात सांजारतीची लगबग चालू होती. वाहन तळाजवळच असलेला बाजार आणि गर्दी मला तेवढीशी आवडली नाही. आमचा मुक्काम क्रिष्णाश्रमात होता. आधी पाठिवरची सॅक तिकडे ठेवावी म्हणून तिकडे चाललो तर काय, गंगेचा तो  प्रचंड प्रवाह सामोरा आला, तो धिरगंभिर आवाज, उसळता प्रपात, पर्वताच्या मधून वाट काढून घाईने निघालेली माता गंगा........, मी मनोमन नतमस्तक झालो. पुढचा प्रत्येक क्षण हा भारलेला होता. अशा ठिकाणी गेल्यावर मला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. विजेचा लपंडाव चालू होता पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती. मोकळ्या आकाशाखाली आश्रमातली पंगत बसली होती, आम्हीही त्यात सामील झालो. थंडी बरीच होती. उसळत्या प्रवाहाचा निनाद ऎकत कधी झोपी गेलो समजलच नाही.

पहाटे लवकर जाग आली. आम्हाला आज गोमुखला जायचं होतं. आश्रमातली काकडआरती संपऊन लगबगीने गोमुखच्या दिशेने निघालो. नुकतच गंगोत्री नॅशनल पार्क घोषीत झाल्याने वनखात्याची लेखी परवानगी आणि फी भरल्याशिवाय गोमुखला प्रवेश करता येत नाही. ते सोपस्कार पार पडले आणि अठरा किलोमिटर दूर असलेल्या गोमुखकडे निघालो. वाटेत गोमुखकडे जाणारे आणि परतणारे यात्री भेटत होते. त्यात बहूतेक कावड-यात्री होते. जय भोलेनाथ म्हणून ते एकमेकांच्या उत्साहात भर घालत होते. जसजसे आम्ही उंचावर जात होतो तसतसा थकवा जाणवायला लागला. एवढ्यात चिडबासा हे ठिकाण लागलं. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून तिथे थांबलो. पुन्हा उठताना पाय कुरकुर करू लागले. आम्हीतर त्याच दिवशी परतणार म्हणून ठरवलं होतं. ती एक पायवाट होती. दगड धोंड्यानी भरलेली. जरा जपूनच चालावं लागत होतं. मनात गोमुख पाहण्याची ओढ होती. पण पाय हाळूहळू चालत होते.

हा परिसर आता नॅशनल पार्क असल्याने वाटेत काही खाण्या पिण्याची सोय नव्हती. बरोबर आणलेली बिस्किट, ड्रायफ्रूटस् खावीत, वाहत्या झर्‍याचं स्वच्छ गोड पाणी प्यावं आणि मार्गक्रमण करीत रहावं असं चालू होतं. वाटेत ठिकठिकाणी कचरा टाकण्याची सोय केलेली होती. आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची विनंती करणारे बोर्ड लावले होते. आमची वाटचाल सूरू होती. एवढ्यात कच्ची ढांग लागली. विजयजी अनेकदा गोमुखला येऊन गेल्याने ते मला सतत सुचना देत होते. हा दिडेक किलोमिटरचा भाग ठिसूळ मातीचा होता. वरून दगड सुटत होते आणि खाली दरीत कोसळत होते. त्यामुळे सतत सावधान रहावं लागत होतं. एक ठिकाण तर असं आलं की तिथली माती,दगड-ढोंडे वरून खाली घसरत चालले होते. त्यावरून घसरायला झालं तर गोमुख सोडून दरीच्या दिशेने प्रवास सुरू व्हायचा. खुप काळजीपुर्वक आणि जीवाच नाव शिवा ठेऊन मी तो रस्ता पार केला. खेचरावरून जाणारे तर जीव मुठीत धरूनच चालले होते. अपरंपार श्रद्धा किंवा हौस या सगळ्या अडचणींवर मात करत होती. शेवटी भोजबासा जवळ आलं. लालबाबाच्या आश्रमात मुक्काम ठोकावा लागला. कारण आम्ही आधी ठरवल्या प्रमाणे त्याच दिवशी परतणं शक्य नव्हतं.

सांध्याकळचे चार वाजून गेले होते. अजून दिड किलोमीटर चालल्यावर गोमुख दर्शन होणार होतं. आजच जाणं भाग होतं निघालो....... पाय उचलवत नव्हते. दूरूनच प्रवाह दिसला. वाटलं आलो. पण.... दिसणं आणि असणं यात फरक पडतोच. अजून बरच अंतर चालायचं होतं. वाटेत भरल दिसले. त्यांचा मान राखला. फोटो काढले निघालो.... शेवटी त्या प्रवाहापाशी येऊन पोहोचलो...... उभे राहिलो......... बसलो...... नतमस्तक झालो. समोरचं दृष्य विलक्षण होतं. हेच ते ठिकाण, जिथे गंगा स्वर्गातून अवतीर्ण झाली असं आपण मानतो. समोरचा देखावा तर स्वर्गीयच होता. प्रचड मोठा असा हिमाच्छादीत प्रदेश, ग्लेशर आणि त्याच्या आतून जोरदार मुसंडी मारत निघालेला एक प्रवाह. याच त्या शिव-शंकराच्या जटा. पलिकडे शिवलिंग पर्वताचं शिखर सोनेरी उन्हात न्हाऊन निघालं होतं. बरोबर आणलेल्या बाटल्यांमध्ये गंगाजल भारून घेण्यासाठी मी प्रवाहा जवळ गेलो. हात गारठून टाकणारं स्पटीक मिश्रीत निर्मळ जल भरून घेतलं. त्याने आम्हाला कधीचच भारून टाकलं होतं. शक्य तेवढा वेळ थांबून ते दृष्य डोळ्यात साठऊन घेतलं आणि पुन्हा आश्रमाकडे वळलो.
पहाटे जाग आली तेव्हा बाहेर येऊन पाहिलं तर ढग दाटून आले होते. सगळीकडे धुकं भरून राहिलं होतं. दोन-तीन मिटरवरचंही निट दिसत नव्हतं. हिमालयातलं वातावरण कधी कोणतं रुप घेईल सांगता येत नाही. आम्ही परतीच्या वाटेला लागलो. पुन्हा ती कच्ची ढांग. कालचा अनुभव गाठीशी होताच. पण आज दृष्यमानता कमी होती शिवाय वरच्या वाजूला भरल उड्या मारत होते. त्यांच्या पायाखालचे दगड निसटून खाली येत होते. ते जाईपर्यंत थांबलो. भोज वृक्षाचे फोटो काढले. हेच ते वृक्ष ज्यांच्या पानांवर (भुर्जपत्रावर) पुर्वीचे ऋषी-मुनी ग्रंथ लेखन करायचे. पुन्हा चिडबासा आलं. विजयजी मागच्या प्रवासातील आठवणी सांगत होते. चालणं सुरू होतं. काल चाललेली वाट आज ओळखीची वाटत होती. दूरवरून मोबाईलचे मनोरे दिसू लागले. गंगोत्री जवळ आल्याचं ते निदर्शक होते. शंभरेक पायर्‍या उतरून गंगा मंदीराच्या प्रांगणात आलो. आयुष्यात एकदातरी करावं असं गोमुखचं दर्शन करून आम्ही तृप्त झालो होतो. सुर्य कुंडातून उसळणार्‍या गंगाजला बरोबर मनातही भावनांचा कल्लोळ सुरू होता. आज पर्यंत जे केवळ ऎकलं होतं ते प्रत्यक्षात पाहून मी धन्य झालो होतो.                                       
                  
















11 May, 2010

कुणी घर देता, का घर?


(एक बातमी: म्हाडाचा उद्याचा चावीवाटप कार्यक्रम रद्द
म्हाडाच्या घरांचा वर्सोव्यातला चावीवाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. कायद्याला धाब्यावर बसवून मुंबईत एक फ्लॅट असतानाही काही नेत्यांनी म्हाडाचा आणखी एक फ्लॅट आपल्या नावावर करून घेतला सर्वसामान्यांसाठी बनवलेल्या योजनेवरही या धनाड्य नेत्यांनी हात मारलाय. मुंबईत स्वत:चा प्लॅट असतानाही म्हाडाची घरं लाटणाऱ्या नेत्यांचा पर्दाफाश झाला आहे.)



कुणी घर देता, का घर?
आम्हा दोनशे एकवीस आमदाराना
कुणी घर देता, का घर?

आमदार निवासाच्या खोल्यात रहाणं
आता आम्हाला सोसवत नाही
मंत्री असलो तरी ते पद केव्हा जाईल
सांगता येत नाही, ......म्हणूनच म्हणतो
कुणी घर देता, का घर?

प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार
तसा आमच्या घरातल्या प्रत्येकाला
घराचा अधिकार ......म्हणूनच म्हणतो
माझं घर असलं तरी माझ्या घरातल्या प्रत्येकाला
कुणी घर देता, का घर?

आम्हीही कधीतरी म्हातारे होणार
नव्हे आमच्या पेकी कित्येकजण म्हातारेच आहेत
तेव्हा आहे त्या घरातून बाहेर पडल्याबरोबर
दूसर्‍या घरात जाण्यासाठी
कुणी घर देता, का घर?

अरे म्हाडा कोणासाठी लोकांसाठी ?
की या लाखांच्या पोशिंद्यांसाठी ?
वरळीला चालेल, झालचतर वर्सोव्याला चालेल
कुठेही चालेल, पण कुणी घर देता, का घर?
 
म्हाडाची गाय तर आमच्याच दावणीला बांधलेली
कसायाला म्हणूनच ती धार्जिणी झालेली
घराची चावीसुद्धा अशी हाताजवळ आलेली
पण तेव्हढ्यात कुणीतरी शिंकलं! आता.... ते घर?
ते घर...? कुणी घर देता, का घर?



10 May, 2010

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा यशस्वी

 

ब्लॉगर हा एक उत्साही मनूष्यप्राणी आहे हे काल पटलं. मे महिन्यातला रविवार, त्यात कित्तेकानी दुपारीच घर सोडलेलं. काही तर थेट पूणे, नाशिकहून आलेले. एकमेकांना भेटण्याची उर्मी एवढी की गर्मीवर मात करून मंडळी वेळेवर पोहोचली होती. कांचन कराई (मोगरा फुलला), महेंद्र कुलकर्णी (काय वाट्टेल ते), रोहन चौधरी (माझी सह्यभमंती) हे जणू आपल्या घरचंच कार्य असल्यासारखे सर्वांचं स्वागत करत होते. सगळेच एकमेकांना पहिल्यांदाच भेटत असूनही एखाद्या शाळेतल्या वर्गाचा स्नेह मेळावा असावा अशी आपुलकी दिसली.

साहित्य संमेलनातले रुसवे फुगवे, लाथाळ्या, राजकारण आणि मुळ उद्देशाला लावलेली काडी हे पाहता या मेळाव्याचं यश उठून दिसलं. जेष्ठ-कनिष्ठ, लहान-मोठा असले कसलेच भेदभाव नव्हते, की मिरवणं नव्हतं. मुख्य आयोजक कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी, रोहन चौधरी हे सुद्धा इतरांच्या बरोबर बसले होते. (खरंतर त्यांनी व्यासपीठावर बसणं संयुक्तिक ठरलं असतं.) स्वतः लांबलचक भाषणं न ठोकता सर्वांना मन मोकळं बोलू देण्यात आलं. महाजालात मराठीचा जास्तीतजास्त वापर कसा होईल, शुद्धलेखन करण्यासाठी काय करावं अशा कळीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्व क्षेत्रातले, वयोगटातले ब्लॉगर्स एकत्र आले आणि तो एक आनंद मेळा संपन्न झाला.

मिलिंद वेर्लेकर यांच्या राजाशिवाजी.कॉम  विषयीची माहिती, महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिव लीनाताई मेहेंदळे यांच्या बत्तीस ब्लॉग वरचं विवेचन, नेट-भेट वाले सलील चौधरी आणि प्रथमेश  यांची थेट-भेट, ज्येष्ठ नागरिक संघ विलेपारले यांचा ब्लॉग कसा चालतो इत्यादी बद्दल ऎकून आणि सर्वांना भेटून कालचा रविवार कामी आला तसच संस्मरणीय ठरला. हे सगळं घडवून आणणारे आयोजक आणि उपस्थित ब्लॉगर्स यांचे मनापासून आभार. आणखी एक, आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर चहापान, अल्पोपहार प्रायोजित करणार्‍या अनाम दानशूरास धन्यवाद......!   

नरेन्द्र प्रभू
                      

07 May, 2010

सौभाग्यकांक्षिणी


ऎश्वर्य नसे हे माझे तूजला भारी
मन मनात गुंफून आले सखया दारी

तूज जड होईल ते नकोच मजला आहे
हे भान ठेऊनी मी उंबरठ्यावर आहे

बीज साठवते रे गुपीत उद्याचे सारे
मग, गंधीत होती वसंतातले वारे

फुलऊन मनाची बाग, राग गाताना
स्वप्नास पाहिले असे खरे होताना

संसार सुखाचे इंगित हेच असावे
जे एक दुजाच्या भावातून उमलावे

नरेंद्र प्रभू

अखेर ताडोबाला ‘बफर झोन’ लाभले


महाराष्ट्रातील वन क्षेत्र आक्रसत चालले आहे. वन मंत्री हे वनांचे संरक्षक न होता भक्षक होत आहेत. महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांच्या पहिल्याच जाहिर सभेला मी उपस्थित होतो. त्यानी या खात्याचा कारभार नाराजीनेच स्विकारल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होतो. कोकण असो नाहीतर विदर्भातील ताडोबा जंगल, संबंधीत राजकारण्यांना ती आपली बापजाद्याची मिळकत वाटत असावी. कोकणात जसे मायनींगचे प्रकल्प येत आहेत तसाच आघात ताडोबावर घालण्याची तयारी महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी चालवली होती. मंध्यंतरी केंद्रीय वन मंत्री जयराम रमेश यांनी महाराष्ट्राचे वन मंत्री पतंगराव कदम यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. वन खात्याच्या कारभारावर नाराजी प्रकट केली होती. ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात अदानीच्या  कोळसाखाणींना परवानगी द्यावी म्हणून आपले राजकारणी देव पाण्यात घालून बसले होते. पण केंद्रीय वन खात्याने हा प्रस्ताव हाणून पाडला.

गेल्या २६ जानेवारीला केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी ताडोबाची पाहणी केल्यानंतर राज्य शासनाने तातडीने बफर झोनची अधिसूचना काढावी असे निर्देश दिले होते. यानंतरही राज्य शासन यासंबंधीची अधिसूचना काढण्यास विलंब लावत आहे, हे लक्षात आल्यानंतर गेल्या आठवडय़ात खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना एक पत्र लिहून तातडीने अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मात्र तातडीने हालचाली होवून अखेर शासनाने अधिसूचना काढली. वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये या बफर झोनची निर्मिती होणार असून यात यापुढे कोणत्याही प्रकारच्या खाणींना परवानगी देण्याचा मार्ग बंद होणार आहे ही वन्यप्रेमीना दिलासा देणारी बातमी आहे.

यंदा विक्रमी लाख ३७ हजार पर्यटकांनी ताडोबा व्याघ्रप्रकल्पाला भेट दिली असून तब्बल पाच कोटींची उलाढाल झाली आहे. विविध शुल्काच्या माध्यमातून शासनालाही ४० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे या वरून या प्रकल्पाची लोकप्रियता लक्षात यावी.            

05 May, 2010

न्यायालयाचे तीन सवाल

 
सर्वसामान्य जनतेच्या मनाला दिलासा देणारे तीन निर्णय न्यायालयाने आज जाहीर केले आहेत.

  • तीस तासांच्यावर तमाम मुंबईकरांना वेठीस धरणार्‍या मोटरमेन्सना दमात घेत पासधारकांचं मोटरमेन्सच्या संपादरम्यान जे नुकसान झालं ते त्यांच्या पगारातून का वसूल करू नये? तसच पासधारकांना भरपाई का देवू नये? असा प्रश्न न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला विचारला आहे.
  • IPL स्पर्धेच्या तिकिटावर राज्यसरकारने कर लावला नसल्याने जी जनहित याचिका न्यायालयात चालू आहे त्यात शरद पवाराना प्रतिवादी करा असा न्यालायाने हुकूम दिला आहे.
  • शिवाजी पार्कवर ध्वनीक्षेपकाना तीन दिवसांचा अपवाद वगळता बंदी करण्यात आली आहे.

वरील तीनही मुद्दे असे आहेत की ज्यांची तड राजकारण्यांनी कधीही लावली नसती किंवा अशा गोष्टींकडे लक्ष सुद्धा दिल नसतं. मोटरमेन्सचा संप सुरू असताना ज्या केंद्र सरकारची ही जबाबदारी होती ते सरकार ममता बॅनर्जींकडे डोळे लावून गप्प बसलं होतं. सरकारची म्हणून एक सार्वजनिक जबाबदारी असते हे सुद्धा ते विसरले. ते सोडा पण मुबईतून निवडून आलेले सर्व खासदार, आमदार काही करताना दिसले नाहीत. फक्त मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला.  

IPL स्पर्धेच्या बाबतीत तर राज्य सरकारने कायमच मुळमुळीत भुमिका घेतली. अर्थ संकल्प दुसर्‍या दिवशी सादर करायचा असताना आदल्या दिवशी व्य़ाटचा दर वाढवताना जी तत्परता दाखवली ते सरकार मात्र ज्या IPL स्पर्धेत पैश्याचा पूर वाह्तोय त्याला करमाफी द्यायला निघालं आहे.        

शिवाजी पार्क हे खेळाचंय़ मैदान तीथे तर सदानकदा खेळ सोडून भलतीच प्रदर्शन, मेळावे, सांस्कृतीक कार्यक्रम आणि राजकीय पक्षांच्या सभा सुरू असतात. त्याला आवर कोण घालणार?
हे तीनही प्रश्न खरतर सरकारी पातळीवर सोडवले गेले पाहिजेत पण इथे जनतेचे प्रश्न सोडवायला वेळ कुणाला आहे? जो बघावा तो पैश्याच्यापाठी पळतोय?

पर्यटनाची ऎसी की तैसी








आज श्री. ज्ञानेश्वर मुळे  यांचा बदलता भारत बदलते विश्व : मालदीव ते मलबार : नवे दुवे! हा लेख वाचला. नेहमीप्रमाणे हा लेखही मनाला भावला. मुळेसाहेबांनी याच लेखात इतर बाबींबरोबरच आपल्या देशातील पर्यटनाविषयी नाराजी आणि खंत व्यक्त केली आहे. ते लिहितात मालदीवच्या रिजॉर्ट बेटांवरला अनुभव जसा अद्वितीय आहे तसाच केरळमधला बॅकवॉटरचा अनुभव अनुपमेय आहे. दोन्हीही आनंद समुद्राशी आणि पाण्याशी जवळीक असणारे. रिजॉर्टमध्येही संपूर्ण जगापासून अलिप्त होण्यातले सुख आहेतसेच सुख हाऊस बोटीतून बॅकवॉटरमधल्या मुक्कामातही आहे. साम्य स्थळांबरोबरच आपली काही वैगुण्येही नजरेत येतात. आलेप्पीत ज्या स्थानकावर हाऊसबोटी पर्यटकांना घ्यायला किंवा सोडायला येतात तिथे तलाव आणि तलावाच्या आसपासचे वातावरण हळूहळू घाणेरडे होत चालले आहे. जलपर्णीचा प्रादुर्भाव इतक्या प्रचंड प्रमाणात आहेकी १०-२० वर्षांत बॅकवॉटरऐवजी जलपर्णीचा हिरवा गालिचा दाखविण्यासाठी पर्यटकांना आणावे लागेल. मालदीवमध्ये पर्यटकांची प्रचंड आवक असूनहीस्पीड बोटींचा वावरही खूप असूनही समुद्राचे पाणी धक्क्यांजवळसुद्धा स्फटिकवत पारदर्शक असते. त्यामुळे माशांची विविधता कल्पनेपलीकडची आहे आणि जिथे पाहू तिथे समुद्र म्हणजे एखाद्या नैसर्गिक मत्स्यालयासारखा समोर येतो. पर्यावरण चळवळीत जोपर्यंत हाऊस बोटींचे मालकतिथले कर्मचारी आणि पर्यटक सर्वाचा सहभाग घेत नाही तोपर्यंत बॅकवॉटरची घसरण होत राहणार आहे. शेजारी छोटा असला तरी त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.

त्या मालदीव बेटावर त्यांच्या लोकसंखेच्या दुपटीहून अधिक पर्यटक भेट देतात. काय आहे तीथे? केवळ पणीच पाणी आणि तुटपुंजी जमीन, असं ससलं तरी योग्य नियेजनामुळे आणि देशप्रेम तसच शिस्तीमुळे त्यांना ते शक्य होतं. हे वाचताना मला तीन वर्षापुर्वी अनुभावालेलं नैनीताल आणि आसपासचा परिसर आठवत राहीला आणि हे पोस्ट लिहावस वाटलं. निसर्गाने भरभरून दिलं असताना आपल्याला मात्र त्याची पर्वा नाही, किंबहूना अनास्थेपोटी आता ते धन आपण गमावून बसणार की काय अशी भिती वाटायला लागली आहे. मे महिन्यात हिमालयाचं मनोहारी दर्शन घ्यावं, उकाड्यावर उतारा म्हणून नैनीतालला जावं म्हणून आम्ही तिकडे गेलो. चिड पाईन च्या  वृक्षांच्या साथीने फिरताना मनाला आनंद होत होताच पण दुरवरची शिखरं आणि प्रदेश दिसत नव्हता कारण वातावरणात धुरकटपणा भरून राहिला होता. ड्रायव्हरशी बोलताना लक्षात आलं की साधारण एप्रिल पासून हे असच वातावरण असतं. त्याचं कारण जंगलाला लागणारे वणवे  अख्खा परिसर धुराने व्यापून राहिलेला. चिडाच्या झांडांना छेद देऊन त्याचा चिक वनखात्यामार्फत जमा केला जातो. त्या झाडाची वाळलेली पानं आणि हा चिक ज्वालाग्राही असतो. जरा कुठे ठिणगी पडली की बघता बघता त्याचं वणव्यात रुपांतर होतं. मोठमोठी झाडं आणि जंगल आगिच्या भक्षस्थानी पडतं. याला जबाबदार कोण? वाटसरूंनी टाकलेलं एखादं विडीचं थोटूक जसं याला कारणीभूत ठरतं तसच मुद्दामहून लावलेली आग याला कारण असते. जंगलातले प्राणी पकडण्यासाठी एकाबाजूला आग लावून दुसर्‍याबाजूला जाळी लावली जातात, विनासाय्यास शिकार जाळ्यात येते पण वनसंपत्तीची अपरिमीत हानी होते.

नुकतेच माझे काही मित्र नैनीतालला जाऊन आले. अशा प्रकारच्या वातावरणात आणखी भर पडली आहे हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. हे असं किती दिवस चालणार? हे वणवे कधी विझणार? निसर्ग दयामाया दाखवत नाही हे आपणाला कधी समजणर? आपल्या देशातलं पर्यटन वाढलं पाहिजे तर अशा गोष्टींना आपणच पायबंद घातला पाहिजे. आपणच आपल्या पायावर कुर्‍हाड चालवतो आहोत, आता तरी जागे होऊया.       
               
   

04 May, 2010

गिरचे अभयारण्य


गिरच्या अभयारण्यातील सिंहांची संख्या वाढली ही बातमी वाचली आणि मी त्या अभयारण्यात अनुभवलेला थरात आठवला. २००२ च्या नोहेंबर महिन्यात आम्ही द्वारका, सोमनाथ  गिर अशी सहल केली होती. वेरावळहून गिर अभयारण्याच्या दिशेने निघालो. आम्ही मुख्य गेटजवळ पोहोचलो तेव्हा पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणारं वाहन निघून गेलं होतं. आणखी दुसरं सरकारी वाहन तीथे नव्हतं. आम्ही मारुती व्हॅन घेऊन गेलो होतो तीच घेऊन आत जाता येईल असं समजल्यावर बरं वाटलं कारण आमची बरीच रखडपट्टी झाली असती. चार-साडेचार वर्षाची ऋचा, मी आणि हर्षदा अशी आम्ही तीघं व्हॅनमध्ये पाठीमागे बसलो होतो. पुढे वन विभागाचा एक गार्ड आणि ड्रायव्हर. त्या व्हानने जंगलात प्रवेश केला. सगळीकडे खुरटी काटेरी झुडपं. तसा रुक्ष प्रदेश. मधेच एखादं झाड बाकी जंगल म्हणावं असं काही नाही. दुरवर एक सिंह दिसला. मी कॅमेरा घेऊन तयारीतच बसलो होतो. त्याचा फोटो काढला. पुढे एक सिंहीण आपल्या तीन छाव्यांना घेऊन एका झाडाखाली बसली होती. थोडं अंतर राखून आमची गाडी उभी राहीली, तर ती गुरगुरायला लागली. आमच्या उपस्थितीमुळे ती थोडी नाराजच झाली होती. गार्डने गाडी पुढे न्यायला सांगितलं. आमची काहीच हरकत नव्हती. आलो तसे सिंहांच दर्शन तर झालं होतं. आता एका वाटेच्या फाट्याजवळ आलो तर समोरून तीन सिंहीणी येताना दिसल्या. आता आम्ही त्या जंगलाला सरावल्या सारखे झालो होतो. माझ्या वाजूचं व्हॅनचं दार उघड होतं. समोरून येणार्‍या सिंहीणींचा मी एक फोटो काढला. त्या आणखी जवळ आल्या दुसरा फोटो काढला. एक मागोमाग येणार्‍या त्या सिंहीणी समोरच्या वाटेने जाणार असं वाटत असतानाच त्यातली एक आमच्या दिशेने वळली. मी आणखी एक फोटो घेतला, हा फोटो घेतेवेळी  झालेल्या शटरच्या आवाजाने किंवा आमच्या वासाने ती जवळ आली असावी. ती आणखी जवळ आली. मी फोकस करतच होतो. ती खुपच जवळ आली. पुर्ण फ्रेम भरली. नकळत जोरजोरात श्वास सुरू झाला. सगळे जण श्वास रोखुन पहात राहिले. तीचे मासल पंजे माझ्या अधिकच जवळ आले. आता मी तिच्या रेंज मध्ये होतो.  फोकस केला असतानाही मी शटरचा आवाज होईल म्हणून फोटो काढला नाही. म्हटलं उगाच तीचा गैरसमज नको किंवा काहिहि समज असो तीचा मान राखलेला बरा. थोडावेळ हुंगून ती निघून गेली. तीने मला माफ केलं होतं.  
                       

03 May, 2010

मोटरमनचं आंदोलन

 
 
मुंबईकर हा मुळात फार सहनशील प्राणी आहे. ‘प्राणी’ अशासाठी म्हटलं कारण घराबाहेर पडलं (यातले कित्तेक बेघर आहेत, ते कायमचेच घराबाहेर असतात.) की त्याना माणूसकीची वागणूक फारच कमी प्रमाणात मिळते. (ग्रंथालीचे दिनकर गांगल एकदा म्हणाले होते की “आपण माणूस आहेत ही भावना युरोपमध्ये गेल्यावर प्रकर्षाने जाणवली.”) घरातून बाहेर पडल्यापडल्या आपण एकदम रस्त्यावरच येतो. फुटपाथ दाखवा आणि एक लाख मिळवा अशी रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे. बरं रस्ते तरी नीट आहेत का? तर ते ही सतत खोदलेले असतात. (मलिदा खाण्यासाठी कुठचा रस्ता खोदू असं सगळ्या संबंधिताना झालेलं असतं.) हल्लीच “विकास हवा तर हे सगळं सहन केलचं पाहिजे असा दम मुख्यमंत्र्यानीच भरला.” एवढं करून टॅक्सी, रिक्षा काही करावी तर तो त्याला हवं तिकडेच जाणार म्हणतो. आपलं स्वतःचं वाहन असलं तरी पंचाईत कारण पार्कींगचा प्रॉब्लेम, ट्राफीक जाम. या सगळ्यात एक आधार वाटतो तो म्हणजे लोकलचा. त्या लोकलचं महत्व एवढं की ते आता त्या चालवणार्‍या मोटरमननाही समजलं. त्यानी आता असहकाराचं हत्यार उपसलंय. ते म्हणे उपाशीपोटी लोकल चालवणार. कारण त्याना जो कमीत कमी पन्नास साठ हजारावर मोबदला मिळतो तो पुरत नाही. ते म्हणे ३६५ दिवस गाड्या चालवतात. सगळीच वाहन (बस, टॅक्सी, रिक्षा, ट्रक) ३६५ दिवस चालू असतात. मोटरमना सुद्धा CL, PL असतातच. भत्ते असतातच, ऑपशनल हॉलीडे असतातच.

गेली दोन वर्ष मी पहातोय मध्य रेल्वेची वाहतूक तरी वेळेवर सुरू आहे पण पश्चिम रेल्वेचं काही खरं नाही. सदानकदा गाड्या उशिराने धावत असतात, कारण काय तर त्याना कमी मिळणारा ओव्हरटाईम. सद्ध्या उकाड्याने जीव हैराण होतोय, पावसाळा तोंडावर येतोय. खोदलेले रस्ते, गुडघाभर पाणी, संथ वाहतूक आणि हे सगळ सहन करत, खांबा खांबावरून हसणार्‍या राजकारण्यांची थोबाडं पहात, आपणाला कुणीच वाली राहिला नसल्याचं शल्य उरी बाळगून मुंबईकर वाटचाल करीत रहाणार. अगदीच राग आला तर असं कलकत्त्यात ( चुकलो रे बाबा कोलकात्यात) झालं असतं तर.............! म्हणत आपल्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी जिवाची बाजी लावणार. काही जण मरणार काही जगणार उद्याचं मरण जगण्यासाठी. 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates