30 April, 2010

आपण तो विषय सोडून देऊया...!


लहानपणी मित्रांबरोबर भांडणं व्हायची, मग अबोला धरायचो. दोघांनाही एकमेकांबरोबर बोलायचं असायच पण आधी कोण बोलणार यावर गाडी अडायची. ताण असह्य व्हायचा, मग पुन्हा बोलणं सुरू व्हायचं. त्या भांडणातही मजा असायची. भांडणाला काय, साधं कारणही पुरायचं. असं असलं तरी किती दिवस कट्टी करून रहायचो आम्ही.

परवा ऋचावर (माझ्या लुलीवर) रागावलो, थोड्या वोळाने मलाच वाईट वाटलं म्हणून तीला जवळ घेतलं, तीची समजूत काढली, तरी ती जरा गुश्शातच होती. मी ऑफिसला निघून गेलो. मनात हा विषय होताच. तासाभरातच ऋचाचा फोन आला म्हणाली बाबा आपण तो विषय सोडून देऊया? मी लगेच हो म्हणून टाकलं आणि मोकळा झालो. विनाकारण आलेला ताण तीने किती झटकन निवळून टाकला. अगदी रिलॅक्स वाटलं. आताची पिढी किती शहाणी झालीय नाही. भांडण - रागावणी समजूत काढणं कुणाची चुक म्हणून वाद घालणं त्यावरून पुन्हा रागावणं पुन्हा अबोला इत्यादी... इत्यादी असली भानगड नाही सरळ मुद्द्यावर येत सांगून टाकलं आपण तो विषय सोडून देऊया...!

तणावातून मोकळं होण्याचा किती छान उपाय!        
     

29 April, 2010

घर चिमणीचं


आम्ही जेव्हा सांताकृझला राहायला आलो तेव्हा पहाटे जाग यायची ती चिमण्यांच्या चिवचिवाटाने आणि पक्षांच्या किलबिलाटाने. गेल्या दहा-अकरा वर्षात तो आवाज हळूहळू कमी-कमी होत गेला आणि आता चिमणी शोधूनही सापडत नाही. कावळे आणि कबुतरं तेवढी आहेत. मधूनच दिसणारा एखादा पक्षी सोडला तर समस्त पक्षीगणांनी आमच्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षापर्यंत कलकलाट करणार्‍या मैनासुद्धा आता दिशेनाश्या झाल्या आहेत. समोरच्या झाडावर बसून आपल्या उच्चरवाने लक्ष वेधून घेणारे पोपटही आता अभावानेच दिसतात. या सगळ्यांच्या सहवासाने आम्ही खरच आनंदीत व्हायचो, ते सगळे पक्षी आम्हाला सोडून कुठे गेले? का गेले? मोबाईलच्या जाळ्यामुळे त्यांची संख्या रोडावली की वाढत्या प्रदुषणामुळे? या सगळ्यावर उपाय काय? वृत्तपत्रात चिमणीच्या घरट्याविषयी वाचलं होतं, नुकतच महेंद्र कुलकर्णींनी आपल्या ब्लॉगवर चिमणीच्या घराविषयी चांगलं पोस्ट लिहीलय. म्हटलं चला आपण प्रयत्न करून बघूया.


ऋचाची परिक्षा संपली आणि आता सुट्टी सुरू झाली ती संधी साधून आम्ही दोघांनी चिऊताईसाठी घर बनवायला घेतलं. साधनांची जमवाजमव केली. ऋचाला वाटलं आता झटक्यात घर बनवून होईल. पण कसचं काय. प्लाय कापता कापताच नाकी नऊ आले. पण आम्ही हट्टालाच पेटलो (बरं झालं त्या धर्माने ऋचाला श्रमाचं मोल कळलं. मी असले धंदे बर्‍याच वेळा केले असल्याने मला ते आधीच माहीत होतं.) शेवटी एकदाच ते घर आकाराला आलं. गॅलरीत त्याची स्थापना झाली. समोर पाणी ठेवलं, आता बघूया चिमणी कधी प्रसन्न होते ते.

चिमण्यांचा निवारा आपण माणसांनीच उध्वस्त केला आहे. आता त्यांच्यासाठी घर बांधलं तर त्या परत येतील अशी आशा करूया.              
         






27 April, 2010

मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झालाय इती.- मुकेश अंबानी


मराठी  माणसाला धंदा करता येत नाही, मराठी  माणूस डाऊनमार्केट आहे मराठी  माणसानी चाकरीच करावी अशा शेलक्या शब्दात मराठी माणसांची संभावना गेली अनेक वर्ष मराठी  माणूसच करत आहे आणि त्यामुळेच मग दुसरा कुणीतरी त्याची री ओढतो. पण यावर उपाय काय? मुळात मराठी माणूस तसा आहे काय? तर त्याला उत्तर नाही असचं आहे. हे दुसरं तीसरं कुणी म्हणत नसून मुकेश अंबानीचेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड  यांचं म्हणणं आहे.

त्यांच्या लेखातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. 

 

  • मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.
  • सौंदर्याची आणि श्रीमंतीची खाण असणा-या या भाषेवर माझेही मनापासून प्रेम आहे.
  • आपली मुंबई हे बॉलिवूड म्हणून ओळखले जाते याचा मला खूप अभिमान वाटतो.
  • भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारा मराठी सिनेमाही आता पुन्हा एकदा नव्या जोमाने आहे.
  • आता रिलायन्समध्येही ज्येष्ठ पदांपासून कनिष्ठ वर्गापर्यंत मोठ्या प्रमाणात मराठी माणसे काम करताना दिसतील
  • 'मराठी माणसाला धंदा करता येत नाही ' हा आता इतिहास झालाय.
  • मराठी माणूस व्यवसायात मागे का? अगदी मनापासून सांगायचे तर हे वाक्य कदाचित काही दशकांपूर्वी खरंही असेल, पण आज असे चित्र बिलकूलच नाही
  • नव्या ज्ञानाधिष्ठित समाजरचनेमध्ये मराठी माणूस अग्रणी असेल यात मला तरी शंका वाटत नाही. 
  • व्यवसाय करणे हा एका समुदायाची किंवा जातीची मक्तेदारी राहणेच शक्य नाही
  • घराणेशाही आणि समुदायाच्या परंपरेतून मिळणारा व्यवसायाचा वारसा हा फार काळ टिकणार नाही. 
  • महाराष्ट्रातील शिक्षणाची संस्कृती या नव्या युगात उद्योजकतेची कास घेताना मला दिसतेय.
  • महाराष्ट्र हा भक्ती आणि शक्तीचे अद्वैत आहे.

 

मुकेश अंबानींचा हा संपुर्ण लेख नितीन पोतदार.कॉम वर अवश्य वाचा. अंबानी सारख्या सोनारानेच कान टोचलेत ते बरं झालं पणं याच गोष्टी गेली दोन वर्ष सभा-समारंभातील भाषणातून आणि वृत्त्पत्रातील लिखाणातून कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार  जोरदारपणे सांगत आले आहेत. गेल्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्रिमितीच्या स्वप्न बघा स्वप्न जगा   या विशेष कार्यक्रमात व्याख्यान देताना त्यानी या सर्वच गोष्टींचा उहापोह केलेला दिसतो. (वाचा: विचारांची आतषबाजी नितीन पोतदार)  सहजच मी पोतदारांच्या लेखांचा धांडोळा घेतला तेव्हा त्यानी सातत्याने मांडलेला मराठी माणसाविषयीचा दृष्टीकोन आणि कळवला दिसून आला, वानगी दाखल काही दुवे पुढे देत आहे.



........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे!


2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त सहकार्य’ (collaboration)!


मराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची


महाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे - नितीन पोतदार


महाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा


बिझिनेस नेटवर्किंग’ - मराठी उद्द्योगजगत प्रगतीचा एक्सप्रेस वे!


सीमोल्लंघन - बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)


यशासाठी घ्या राईट टर्न


मराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स!


मराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे!


मराठी मिल्लिओलानिअर 



हे सगळे लेख म्हणजे आपली कर्मभुमीवरची गीताच आहे  तेव्हा वाचा, विचार करा आणि नि:शंक मनाने कामाला लागा. यश आपलच आहे. जय हो...!!!


विनंती: प्रत्येक वाचकाला विनंती, की त्याने हा लेख किमान ५ मराठी माणसांना तो वाचायला आग्रहाने द्यावा.


26 April, 2010

जोझिला खिंडीचे भाग्य उजळणार




लडाखला जो एकदा जातो तो लडाखच्या प्रेमातच पडतो हे सत्य आहे. पहिल्यावेळी मी गेलो तो मनाली मार्गे. दुसर्‍यावेळीही मनाली मार्गेच पण नंतरच्यावेळी श्रीनगर मार्गे जाण्याचा योग आला. श्रीनगर हे नंदनवन असूनही मला कधी एकदा जोझिला खिंड पारकरून लडाख प्रांतात प्रवेश करतो असं झालं होतं. लडाख आहेच तसं महाराजा...!

तर नुकतीच एक बातमी वाचनात आली, जोझिला खिंडी विषयीची. सहा-सात महिने वर्फाच्छादीत असल्याने जोझिला पास मार्गे लडाखला जाता येत नाही. आता त्या जोझिलालाच  भुयार पाडून लडाख बाराही महिने श्रीनगरशी, पर्यायाने भारताशी रस्ते मार्गानेही जोडलेले रहाणार आहे ही आनंदाची बातमी आहे.  
             

24 April, 2010

आयपीएलचे भस्मासूर


‘आयपीएल’ सामन्यांच्या सर्व उत्पन्नाचा हिशेब द्या सगळ्याचाच धंदा होत चाललाय. साहित्य, संस्कृती खेळ काही म्हणजे काही या मधून सुटत नाही. साहित्य संमेलनाची धुळवड झालीय, संस्कृतीच्या नावाखाली दहशत माजवली जाते आणि आता खेळाचा धंदा झालाय. क्रिडा साहित्याचा धंदा नव्हे प्रत्यक्ष खेळाचाच धंदा. आयपीएल फक्त तीन वर्षातच राक्षसासारखं वाढलं. त्याच्याशी संबंधित हितसंबंधीलोक एवढे मातले कि त्याना कशाचच सोयर-सुतक वाटेनासं झालं. धनदांडग्याना कायद्याची, नितीमत्तेची चाड कधीच नसते पण स्वतःचा स्वार्थ पणाला लागला तरी हरकत नाही पण मी म्हणेन तीच पुर्व अशी सत्तेची गुर्मी आणि गर्मी चढली की त्याचा भस्मासूर होतो. या खेळात आता प्रत्यक्ष लक्ष्मीनेच अप्सरेचं रुप धारण केलय त्यात पहिला बळी शशी थरुर यांचा गेला, त्यांच्या पाठोपाठ ललित मोदी रांगेत उभे आहेत. त्यांच्याही मागे मोठी रांग असावी पण सगळ्यांचेच हात काळे असल्याने आता ही मंडळी एक तर हात वर करताहेत किंवा संसदीय समितीच्या बुरख्याआड हे संपुर्ण प्रकरण दडपू पहात आहेत. या प्रकरणाची जर न्यायालयात चिरफाड झाली तर सर्वांचाच बुरखा फाडला जाईल याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे.

राज्यकर्ते हे जनतेचे प्रतिनिधी असतात पण हे, ते राज्यकर्ते आणि जनता सगळेच विसरलेले आहेत. म्हणूनच पुर्वी दडून केल्या जाणार्‍या गोष्टी आता खुलेआम केल्या जात आहेत.  आयपीएलवरचा करमणूक कर रद्द करणं ही कर चोरीच आहे आणि ती प्रत्यक्ष मुख्यमंत्रीच करताहेत. काळ्याबाजारात विकल्या जाणार्‍या तिकिटांवर नको पण मुळ किंमतीवर तरी कर वसूल करा. नागरी विमानवाहतूक मंत्री आपला आयपीएलशी काही संबंध नाही असं भासवत आहेत पण त्यांचीच मुलगी एअर इंडियाच अख्ख विमान आयपीएलसाठी चेन्नईला घेऊन जाते ते कशाच्या जोरावर? तीच बाई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना रात्री उशीरापर्यंत गोंगाट करण्याची परवानगी मागत आहे.   

महाराष्ट्रात बारबालांवर बंदी आहे पण आयपीएलच्या सामन्याच्यावेळी स्टेडियमवरच दारू सर्व्ह केली जाते, चिअर गर्ल्स नाचवल्या जातात, प्रदुषणात भर घालण्यासाठी आतषबाजी केली जाते हे कशाचं लक्षण? उद्या स्ट्रॅटेजिक टाईम मध्ये मैदानातच लावणी किंवा भांगडानृत्य झाल्यास आश्चर्य वाटायला नको.                    

23 April, 2010

से नो टू सीओटू


 

काल से नो टू सीओटू ही बातमी लोकसत्ता मध्ये वाचली आणि मकरंद जोशी या माझ्या मित्राची आठवण झाली. व्यवसायाने आय्.टी. इंजिनीअर असलेला हा माझा मित्र कंपनी विमानाच तिकीट देत असताना शक्य असल्यास हट्ट करून रेल्वेने जातो, सार्वजनिक वाहनातूनच प्रवास करतो. आपण करत असलेल्या कार्बन उत्सर्जनाबाबत तो कमालीचा सतर्क आहे. इथे या पृथ्वीवर येऊन घाण वाढवायचा आपल्याला काय अधिकार? असा त्याचा प्रश्न असतो. ग्लोबल वॉर्मिंगला कारण दूसरा कुणीतरी आहे असं आपण सतत मानत आलो आहोत. पण आपण रोज किती प्रमाणात कार्बन उत्सर्जित करतो ते पहायचं असेल तर   Say No to CO2 या संकेतस्थळाला भेट द्या दुध का दुध पानी का पानी हो जायेगा!      

18 April, 2010

अनंताश्रम


अनंताश्रम नुसतं नाव घेतल्याबरोबर तीथे खाल्लेल्या मटनाचा सुवास अंतरंगात दरवळायला लागतो आणि त्या पाठोपाठ खडपे बंधूंची कोकणी मिश्रीत मालवणी ऎकायला येते. घरच्या जेवणाची याद येणार्‍याला किंवा कंटाळा येणार्‍याला अशा दोन्ही प्रकारच्या माणसांना हमखास लज्जतदार मासळी आणि मटणाचं जेवण खिलवणारी अनंताश्रम ही गिरगावातली खानावळ होती. होती असं म्हणण्याचं कारण असं की ती खानावळ आता अर्धवट चालू आहे. कालच सहकुटुंब आडवा हात मारण्यासाठी म्हणून    अनंताश्रमात गेलो तर खडपे भेटले आणि मिस्कीलपणे हसत म्हणाले खानावळ बंद, जेवण नाय् मी सर्दच झालो. चला हे कधीतरी ऎकायला मिळणारच होतं. तिथला एक बोर्ड वाचत विचारलं हे काय लिहीलय? तर म्हणाले बुधवार, शुक्रवार आणि शनिवार फक्त पार्सल देतो. मनात म्हटलं नशीब तेवढा तरी आधार आहे. (इथे उघड काही बोलण्याची सोय नाही महाराजा. अनुभवी गिर्‍हाईकाला त्याचा चांगलाच अनुभव आहे.) येत्या ३० एप्रिल पासून बहूदा तेही बंद, असं मालकच म्हणत होते.

गेली सत्त्याहत्तर वर्ष चव न बदलता दर्दी खवय्याला खिलवणार्‍या या खानावळीचा स्वतःचा असा एक वर्ग होता. मी स्वतः गेली पंचवीसेक वर्ष तिकडे जात होतो. महाराष्ट्र टाईम्स चे गोविंद तळवलकर, टाईम्स चे दिलीप पाडगावकर, अभिनेते दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे, मोहन वाघ, शोभा डे अशी दिग्गज मंडळी मला त्या खानावळीत वेळोवेळी भेटली. खडपे बंधू सर्वाशी सारखच अंतर ठेवून वागत. आता तो एक इतिहास होणार आहे. घाईला पण वेळा लागतो अशी पाटी आणि तत्सम अलिखित नियम याची मजाही आता घेता येणार नाही.          

गोव्यात सध्या मांडवी कॉर्नर ला आणि पुढे पर्वरीला  अनंताश्रामाची खानावळ सुरूकरण्याचा त्यांचा विचार आहे. असो आता या पृथ्वीतलावर असं लज्जतदार खाणं मिळणं कठीण आहे असं म्हणण्याची सोय नाही. पण ते प्राप्त करून घ्यायचं असेल तर गोव्याला गेलं पाहीजे आणि अनंताश्रमाच्या वेळा पाळल्या पाहिजेत. करू बाबा ता पण करू, पण पैसे घेवन इतक्या जेवण तरी वाढ !   





       

16 April, 2010

लालबाग परळ – लागली वाट मुंबईची

परवा लालबाग परळ झाली मुंबई सोन्याची हा चित्रपट पाहीला. मन सुन्न झालं. महेश मांजरेकरचा हा शिवाजीराजे नंतरचा आणखी एक चांगला चित्रपट. हा चित्रपट पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९८३ चा जानेवारी महिना असावा. कणकवली जवळच्या तरळा या गावी डॉ. दत्ता सामंतांची एक सभा होती. दीर्घकाळ चाललेल्या गिरणी संपामुळे चाकरमान्याने कधीचीच मुंबई सोडली होती. संपकर्‍यांसाठी त्या सभेचं आयोजन केलेलं होतं. सरकार आपल्या एकी समोर नमत घेईल, केंद्रीय वस्त्रोंद्योग मंत्री विश्वनाथ प्रताप सिंगना लक्ष घालावं लागेल अशा प्रकारे डॉक्टर कामगारांची समजूत घालत होते. पण गिरण्या मंबईला आणि संपामुळे विस्थापीत झालेला कामगार कोकणात, त्यांच्या समोरची ती सभा म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी अवस्था होती. आमच्या गावातल्या एका कुटुंबातले पाचच्या पाच भाऊ गिरणीत कामाला होते. ते गणपतीला गावाला येत तेव्हा त्यांचा रुबाब बघण्यासारखा होता. पण त्या संपाने त्यांची रया गेली. ते कुटुंब देशोधडीला लागलं तशी लाखो कुटुंबांची हालत झाली. त्यांच्या टाळूवरचं लोणी राजकारणी आणि गिरणी मालकांनी खाल्लं. अजूनही खाताहेत. दादर येथील गोल्ड मोहर मिलला २० मार्च २०१० रोजी भीषण आग लागली होती, ती रॉकेल ओतून लावली होती. (वाचा: गोल्ड मोहर मिलला रॉकेल टाकून आग लावल्याचा अहवाल) तशा सगळ्याच आगी लावलेल्या असाव्यात. त्या आगीत गिरणी कामगारांच्या चार तरी पिढ्या खाक झाल्या. चित्रपटात ते वास्तव पहायला मिळतं.                  


15 April, 2010

सारंगताई


हे झाड कुठचं ओ ? हा प्रश्न तसा साधा पण त्यातल्या मालवणी भाषेतल्या हेलाने माझं लक्ष वेधून घेतलं. या बाई थेट मालवणहून सहलीला आल्या असतील असा माझा समज झाला. पन्हाळा आणि पुढे दांडेली अभयारंण्यात फिरताना मात्र आम्ही कायमचे मित्र झाले. सारंगकाका आणि ताई त्या नंतर अनेक सहलींना भेटल्या आणि ऋणानुबंध वाढत गेले. काल त्यांनी घेतलेला D70 कॅमेरा दाखवायला आल्या. येताना कोकणातल्या फणसाचे गोड गरे आणि मालवणी खाजं आणायला विसरल्या नाहीत. मालवणी माणसाला फणसाची उपमा देतात, बाहेरून काटे आणि आतून गोड. पण या सबाह्य गोड स्वभावाच्या. महापालिकेच्या शाळेतून शिक्षीका म्हणून निवृत्त झाल्या पण घरात बसून राहील्या नाहीत. झाडं फुलं यांची खुप आवड, फिरण्याची आवड, जंगलातून फिरताना एखादा प्राणी दिसला की एवढ्या खुश होतील की सांगता सोय नाही. एकदा असाच ताडोबात वाघ दिसला तर या लहानमुलासारख्या उत्साहाने ओरडल्या काय नाय वाघ...!, दिसता बघा कसो...! बाबा माज्या केदो मोठे......, जंगलचो राजोच तो...! त्यांच्यातलं लहान मुल अजून जागं आहे. वयाच्या सदुसष्टव्या वर्षी मधूमेह, स्लिपडीस्कचा त्रास असूनही शिरापडो तेच्यार म्हणत, त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत, आपण आनंदी राहत आणि इतरांना आनंद देत त्या त्यांच्या बालसुलभ स्वभावाप्रमाणे अनेक क्षेत्रात अजून खुप शिकायचं आहे म्हणून रस घेतात आणि प्रश्न विचारतात. आता फोतोग्राफी शिकायची आहे म्हणून म्हणत होत्या. हे असं जगलं पाहीजे. सारंगताईंकडून जगण्याची कला शिकली पाहीजे.                    




10 April, 2010

गोष्ट छोटी पण खुपच मोठी


आत्ताच्या काळात व्यक्तीस्वातंत्र्याचा एवढा अतिरेक होताना दिसतो की घरातही लहान मुलांना बोलायची सोय उरलेली नाही. पालकांनी जरा कुठे रागवलं की काही बाबतीत असं होतं की मुलं सरळ आत्महत्या करतात. हे असं का घडतं? चांगले संस्कार व्हायला पाहिजेत तर छडी लागे छम् छम् चा जमाना गेला तरी मुलांनी स्वैर वागू नये म्हणून त्यांना काहीवेळा समज देणं आवश्यक असतच. जुने जाऊद्या म्हटलं तरी त्या जुन्या अनुभवांवरच आपलं पुढचं पाऊल पडत असतं. कुमारवयात पालकांनी केलेली कानऊघाडणी किंवा पालकांच्या वागणूकीचा मुलांना तेव्हा राग येत असला तरी पुढे आयुष्यात कधीतरी ते वागणं बरोबर होत हे ध्यानात येतं. हरिवंशराय बच्चन हे लेखक कवी म्हाणून आपणा सर्वांना माहित आहेतच पण ते कशाप्रकारचे पालक होते हे अमिताभ बच्चन शिवाय कोण चांगलं सांगू शकेल. हरिवंशराय बच्चन पाकल म्हणून तेव्हा तसे वागले म्हणूनच आजचा बिग बी पहायला मिळाला असं खुद्द अमिताबच म्हणतो. नुकताच लोकसत्तामध्ये एक लेख वाचनात आला. जरूर वाचा शिला..ध्यास!

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates