22 June, 2009

अजी म्या ब्रम्ह पाहीले ....!








साडेबारा टनाचा प्रसाद जो सकाळपासून संध्याकाळ पर्यंत अखंड वाहणार्‍या जनप्रवाहाला मुक्तहस्ते वाटला जातोय. दिड-दोन दिवस अव्याहतपणे चाळीस आचारी आणि शंभरच्यावर स्वयंसेवक झटताहेत. यंत्राच्या वेगाने द्रोण भरले जाताहेत आणि ते भरलेली ताटं मिनीटात रिकामी होताहेत. हे काही कोण्या मुजोर राजकीय पुढार्‍याच्या पोराच्या लग्नातलं लक्षभोजन नव्हे तर हे वास्तव आहे सामाजाने समाजासाठी केलेलं आणि मी याची देही याची डोळा पाहीलेलं, अनुभवलेलं.

देवाच्या आळंदीपासून निघालेला लाखो जनांचा प्रवाह त्या विठूरायाच्या ओढीने अडीजशे किलोमीटरच्यावर रस्ता तुडवत पण शिस्तबध्द रितीने चाललाय, आस एकच केवळ विठूभक्तिची आणि चंद्रभागेत स्नानाची. कुणी दाखवलेलं कसलं प्रलोभन नाही की कसला स्वार्थ नाही. असं असूनही ही प्रचंड सकारात्मक ऊर्जा विठ्ठलमय होवून वहात होती. हा सोहळा पाहून खरोखर भगवंताचं विश्वरूप दर्शन झालं असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. लक्षावधी बाया-बापड्या, मुलं-बाळं, कर्ते-सवरते आणि वृध्द सारे सारे जात-पात, ऊच्च्य-निच सारं विसरून एकाच नावाने पुकारले जातात माऊली...! एरवी अणू-रेणू समान असलेली ही माणसं आज आकाशा एवढी झालेली भासली. दिवसभर १८-२० किलोमीटर वाहत जाणारा हा जनसागर माऊली म्हणून ओळखला जातो. माऊली किती सार्थ नाव. ज्ञानेश्वर माऊली जिच्या ठायी विश्वाचं आर्त प्रकटलं ती आई म्हणजे माऊली आणि त्या नावानेच ओळखला जातोय प्रत्येकजण. माऊली या एका शब्दाने सागळं कसं सोपं होवून गेलं होतं. माऊली जरा थांबा, माऊली वाटं द्या, माऊली पाणी द्या, माऊली प्रसाद घ्या. देणारे, घेणारे, घेणारे सगळे सगळे माऊली. ते एकच तत्व सगळीकडे पुरून उरणारं.

आषाढी एकादशी साठी कानाकोपर्‍यातून निघालेला लक्षावधी वारकरी हे महाराष्ट्राचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव अगदी जवळून बघण्याचा योग आला. धन्य धन्य झालो. या वारी दरम्यान वारकर्‍याला एक सुखाचा घास देता यावा म्हणून झटणारेही तसेच. संपूर्ण वारी करू शकत नाही पण ती करणार्‍यांचा उत्साह वाढावा, त्याना मदत व्हावी म्हणून दरवर्षी न चुकता जेजुरी जवळ जाऊन सेवा करणारे. कसला बढेजाव नाही की कसला आव नाही. वर उल्लेखलेला प्रसाद देता यावा म्हणून झटणारे, वारकर्‍यांच्या औषध पाण्याची सोय करणारे, त्यांच्यावर उपचार करणारे सगळेच माऊली. दुसर्‍या दिवशी त्यातले कुणी भिवंडीकर असतील, कुणी सोपारकर असतील पण त्या दिवशी सगळेच माऊली होते. माऊलीमय झाले होते. एकरूप झाले होते. अवघेची जाहले देह ब्रम्ह.

लेखकः नरेन्द्र प्रभू


17 June, 2009

कधी रे येशील तू

पुन्हा पुन्हा आकाशाकडे

पहावसं वाटतं मला

असाच अवचित पाऊस येईल

भिजावसं वाटतं मला


मग पावसाचे टपोरे थेंब

झेलावेतशे वाटतील मला

मग पाण्याच्या प्रवाहात

खेळावसं वाटेल मला


बंध तोडुन नदी वाहेल

धावत जाऊन पाहीन तिला

धरीत्रीचा हिरवा शेव

मंद वारा घालील मला


पण, मृगात निरभ्र आकाश

घामाने चिंब भिजवलं मला

कृष्ण मेघ कधी एकदा

पाहीन असं झालय मला


नरेन्द्र प्रभू

13 June, 2009

मरण्याची भिती

जन्म आणि मृत्यू केव्हा होणार हे कुणालाच माहित नसतं. या दोन टोकांमधला जो काही काळ असतो ते म्हणजे आयुष्य. हे आयुष्य कसं आणि किती आनंदी करायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं. पण सगळेच आपलं आयुष्य आनंदी करतात का ? आयुष्य आनंदी करणं आणि होणं यात थोडा फरक आहे. जे काही मनाविरूध्द घडतं ते होणं थोडं दूर ठेवलं तर मग आनंदाने जगता येतं. आला क्षण आनंदात साजरा करता येतो.

चिंता, भिती या मुळे सतत दबावाखाली राहून आपण आरोग्यावर परिणाम करून घेतो. आता अशा दबावापासून थोडा काळ दूर राहता यावं म्हणून आपण सहल किंवा यात्रा करतो. पण या सहलीची भिती बाळगणारे महाभाग ही आहेत. ' सात समुद्र पार करून आला आणि गादीवर झोपला असताना मेला ' असं घडतच ना ? थोडक्यात काय मरण काय कुणाला सांगून येत नाही. मग आहे ते आयुष्य आनंदात मनासारखं जगावं हे उत्तम.

असेच ओळखीचे एक गृहस्थ लेह-लडाखला ऑक्सिजन कमी म्हणून सहलीला आले नाहीत. जिथे हजारो लोक जाऊन येतात, लाखो लोग स्थाईक आहेत ते जगतात मग आपल्याला भिती कसली ? मुंबई सारख्या शहरात प्रदुषणाने कमाल पातळी गाठली तरी ऑक्सिजनची नळकांडी घेऊन फिरताना कुणी दिसत नाही.कितीतरी आबालवृध्द आणि पंगू हिमालय पालथा घालतात. तेव्हा तो एकदा तरी पहाच. लेह-लडख, स्पिती व्हॉली, झंस्कार व्हॉली, किन्नोर कैलाशला एकदा जाच. कदाचित तिथे तुम्हाला तुमचा देव भेटेल.

लेखकः नरेन्द्र प्रभू


11 June, 2009

पेला अर्धा सरला आहे ...!

कोणत्याही प्रसंगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे त्यावरच त्यातून आनंद मिळणार कि दुःख हे बर्‍याच वेळा अवलंबून असतं. भरपूर पैसे दिले म्हणजे आता आनंदी आनंद असं नसतं. बघा ना काय झालं ते. तीस- पस्तिस हजार रुपये खर्च करून बाबुराव सहलीला निघाले. पहिल्याच फटक्यात विमानतळावरचा टर्मिनल चुकले. सहलसाथी योग्य वेळी योग्य टर्मिनलवर हजर असताना त्याला आपण आहोत तिथे हजर व्हा असं फर्मावू लागले. इथेच त्यांचा मस्तकशुळ उठला. बाकिची सगळी मंडळी जागेवर हजर असताना बाबुराव मात्र भलत्याच ठिकाणी गेले होते. विनवण्या करून त्याना जागेवर बोलावण्यात आलं. तो पर्यंत बाकिच्यानी बोर्डिंग पास घेतला होता. बाबुरावाना इतरांपासून वेगळ्या ठिकाणी असलेल्या सीटवर बसावं लागलं. झालं, एवढा वेळ विमानात कसा जाणार असा त्यांना प्रश्न पडला. खर तर बाबुरावाना पुढची चांगली सीट मिळाली होती. पण वैतागायला काहीतरी कारण पाहिजे होतं ना ?

विमान गंतव्य स्थानी पोहोचलं. बाबुरावना न्यायला गाडी आली होती. पण गाडी पर्यंत जाताना अर्धा मिनिट लागणारं ऊन त्याना सहन होणार नव्हतं. त्यानी सहल साथीला लगेच प्रश्न केला तुमच्या टोप्या कुठे आहेत ? मला ऊन सहन होत नाही, समजलं ना ? सहलसाथीच्या माथ्यावरची टोपी बाबुरावांच्या कपाळी घातली गेली. पृथ्वीवरचा स्वर्ग समजल्या जाणार्‍या श्रीनगरच्या दल लेक मध्ये उत्तम हाऊसबोटीत बाबुरावांची राहण्याची व्यवस्था होती. त्याना तिथे नेण्यात आलं. तर थोड्याचा वेळात बाबुरावांची तक्रार आली, बाथरूमचं दार सरकावताना त्रास होतो. ( हाउसबोट मधली लाकडी दारं काही वेळा घट्ट असतात, समजुतीने सरकवली तर सरकतात. ) तिथून पुढच्या मुक्कामाला मंडळी गेली. बाबुरावांनी तक्रार करण्यासाठी कारण शोधून काढलं बाथरूमचा लाईट लागत नाही. तिथे बाथरूमचं बटण वेगळ्या ठिकाणी होतं. इतरांना सहज सापडणार्‍या गोष्टी बाबुरावाना तक्रार केल्याशिवाय सापडत नव्हत्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी मंडळी तयार झाली. बाबुराव सांगितलेल्या वेळी तयार होते, पण त्यांच्या बस मधली मंडळी जरा उशिराने आली. बाबुरावांच पित्त खवळलं. आम्ही वेळेवर येतो आणि हे मात्र वेळ काढतात. समजूत घालून गाडीत बसवलं. संध्याकाळी उतरल्यावर बाबुराव तक्रारीच्या सुरात म्हणाले, सगळेजण आपापसात बोलतात, माझ्याशी कुणीच बोलत नाही. जेवणाची वेळ झाली. शाकाहारी पदार्थानंतर मांसाहारी पदार्थ ठेवले होते. बाबुराव भडकले, हे काय ? मांसाहारी पदार्थाबरोबर हे शाकाहारी पदार्थ कसे ? बाबुरावांच्या ताटात मात्र दोन्ही पदार्थ गुण्यागोविंदाने नांदत होते.

कड्याक्याची थंडी आणि उणे तपमान या मुळे एका दिवसाचा कार्यक्रम बदलून पर्यायी कार्यक्रम दिला पण बाबुराव अडून बसले. मुळ कार्यक्रमा प्रमाणे हट्टाने गेले, आजारी पडले. त्या नंतर विश्रांती घेण्या ऎवजी पैसे वसूल करण्यासाठी प्रवास केला. रात्री ताप भरला. सहलसाथीने औषध दिली, बिस्कीट, कॉफीची व्यवस्था केली.

आता परतीचा दिवस आला बाबुरावांचं तुणतुणं सुरू, आता हे आम्हाला वार्‍यावर सोडणार. विमानात बसले, पुन्हा रडगाणं सुरू, हे काय ? पंख्यावरची सीट मिळाली आपल्याला, खालचं काहीच दिसत नाही. दिल्लीला विमान उतरलं. बाहेर ४० अं.से. तपमान. झालं बाबुराव काळजीत पडले, या तपमानात आपण लाह्या सारखे फुलून येणार. कसं सहन करायचं ? मुंबईला प्रस्थान करताना बाबुरावांना मधली सीट मिळाली पुन्हा त्रागा. समोरच्या माणसाला भंडाऊन सोडलं. मुंबईत उतरल्यावर टॅक्सीवाला किती पैसे मागतो म्हणून कपाळाला आठ्या पडल्या.

एकूण काय संपुर्ण सहलीत बाबुराव त्रासिक मुद्रेत होते. या ठिकाणी असं झालं, त्या ठिकाणी तसं झालं. अगदीच काही नाही तर दहा वर्षापुर्वीची सहल आठवून गळा काढत होते. कशी आनंदी होणार आशी माणसं ? पेला अर्धा सरला आहे तिकडेच बघत राहीलं तर मग अर्धा भरलेला पेला दिसणार तरी कसा ?

लेखकः नरेन्द्र प्रभू


comments:


प्रभाकर फडणीस said...

लेख छान झाला आहे. प्रत्येक सहलीत एकतरी बाबुराव असतोच!

Mrs. Asha Joglekar said...

आपण ही कितिदा बाबूरावां सारखेच वागतो ना . असं करायला नको त्यातल्या त्यांत काय़ चांगलं आहे ते बघितलं पाहिजे .

नरेन्द्र प्रभू (Narendra Prabhu) said...

Chetana's comments

I like your poems. Really every one is waiting for rain.
In your blog photos .& descriptions is really very nice.....


Thanks for sending me such a nice mail...



Regards,

Chetana.


Bhiwandikar's comments

PRABHUDA,
PRABHUDA TUMHI DHANNYA AAHAT!!!!!
KITI MAST LIHALA AAHE, GR8.
REKHATAI, MAHESHDA

HAREKRISHNAJI said...

I ahve realised now, many times I also act like Baburao.


भानस said...

अडेलतट्टूपणा हा स्वत:ला तसेच इतरांनाही त्रास देतो. त्यातून ’मी’ ची बाधा म्हणजे मग सगळाच वांधा.
छान.


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates