28 February, 2009

पैठण

औरंगाबादच्या दक्षिणेस ५८ कि.मी. अंतरावर पैठण गाव आहे. औरंगाबादहून निघालो. वाटेत औरंगाबाद सिल्क मिल पाहिली. सुती चादरी, ड्रेस मटेरीयल, शाली यंत्र मागावर बनवल्या जातात. सुतापासून हे सर्व कापड कसं विणलं जातं त्याचं प्रात्यक्षिक पाहता आलं. सोलापुरला आपण चादरी बघण्यासाठी जातो. इथल्या चादरी पण बर्‍या वाटल्या, काही घेतल्या. पुढे वाटेत व्हिडीओकॉन, व्होकार्ड वैगरे कंपन्या लागल्या. औरंगाबाद परीसरात बरीच औद्योगिक वसाहत आहे. वाटेत वाहतूक संथ झाली, पुढे ऊस वाहून नेणार्‍या बैलगाड्यांची रांग लागली होती, श्री. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात ऊस घालायला शेतकरी रांगा लावून होते. ऊस घालून झालेले शेतकरी बैलांना चारा देत होते. एकजण बैलाच्या खुरांना नाल ठोकण्यासाठी त्याला खाली पाडत होता. " बैलाला पाडीताना फोटोघ्या की " एक शाळकरी मुलगा मला म्हणाला. मला टींग्याची आठवण झाली.

मी फोटो काढायला तयार आहे हे पाहून त्यानी बैलाला खाली पाडायचे प्रयत्न सुरु केले. फोटो काढला, सगळा विधी पार पडला. तेवढ्यात आमचा ड्रायव्हर ताजा ऊस घेवून आला. ऊस तोडून खात खात पुन्हा प्रवास सुरू झाला.

पैठण पासून पुढे १५ कि.मी. अंतरावर संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान आपेगाव आहे. तिथे ज्ञानेश्वरांचं छोटसं घुमटीवजा मंदिर आहे. आजुबाजुला भक्तनिवास सारखं बांधकाम चालू होतं. मागे गोदावरी नदीचं पात्र कोरडं पडलेलं. १०-१२ ट्रॅक्टर नदीपात्रातून रेतीचा उपसा करत होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म ज्या मातीत झाला ती माती कपाळी लावावी म्हणून तिकडे गेलो, बाकी तिथे जागेवर कसलीच व्यवस्था दिसत नव्हती. भाव-देव सगळं गायब.

पैठणला गोदावरी नदीत संत एकनाथांनी जल समाधी घेतली. त्या घाटावर पुढे भक्तानी मंदिर बांधलं ते नाथ समाधीमंदिर म्हणून प्रसिध्द आहे. मागे गोदावरी नदीत 

अनेक भक्त आंघोळ करत होते. मंदिरा बाहेर अबीर, गुलाल, पिंजर यांचे पिंडीच्या आकाराचे सुरेख थर लावलेले होते. पैठण गावात जिथे संत एकनाथाचं राहतं घर होतं ते आता नाथमंदिर म्हणून ओळखलं जातं. गोदावरीत स्नान करून नाथ येत, एक माणूस त्यांच्यावर थूंकत असे ते पुन्हा स्नान करून येत, तो मार्ग समजून घेतला. नाथमंदिराला भेट देणारा त्या वेळी मी एकटाच होतो.

नाथसागर/जायकवाडी धरण हे देशातील सर्वात मोठं मातीच धरण बघितलं. गोदावरी नदीवर बांधलेलं हे धरण विशाल आहे. पॉंन्डहेरॉन, बगळया सारखे पक्षी सहजच दिसत होते. चार दोन पर्यटकही दिसले. तिथून पुढे संत ज्ञानेश्वर उद्यानात गेलो. १२४ हेक्टरवर विकसीत केलेलं हे उद्यान त्या भागातलं उत्तम समजलं जातं. बर्‍याच शाळांच्या 

सहली तिकडे आल्या होत्या. काळोख पडल्यावर संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे हे त्याचं मुख्य आकर्षण, पण त्या आधी होणारा कठपुतळी बाहुल्यांचा 

नाच मला जास्त भावला. बाकी उद्यानची देखभाल म्हणावी तशी नाही. दिवस मावळताचं हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला होता. सायंआरतीची वेळ झाली असावी, लहानपणा पासून आरती-भजनात म्हटलेली पैठण, आपेगाव ही गावं प्रत्यक्षात पाहून झाली होती.

लेखकः नरेंद्र  प्रभू




23 February, 2009

अजिंठा लेणी

औरंगाबाद शहर पुर्वीच्या मुघल साम्राजाचा एक भाग, औरंगजेब बादशाहा होण्याआधी जेव्हा या प्रांताचा सुभेदार होता तेव्हाच त्याने खडकी हे या शहराचं नाव बदलून ' औरंगाबाद ' ठेवलं. तर अशा या औरंगाबाद मधून निघालं आणि पुढे दिल्ली दरवाजा मधून बाहेर पडलं की १०२ कि. मी. अंतरावर अजिंठा लेणी आहेत.

औरंगाबादहून निघाल्यावर वाटेत दोन्ही बाजूला दूरवर पसरलेली ऊसकापूस, गहू, ज्वारी, बाजरीची शेतं सतत दिसत राहिली. या वर्षी पाऊस उशीरापर्यंत पडत राहील्याने कणसं अजून हुरड्याला आली नव्ह्ती. नवीन रस्ता गावाच्या बाहेरून काढल्याने वाटेत वस्ती अशी नव्हती. स्वतःचं वाहन असेल तर दोन तासात आपण लेण्यांच्या परिसरात पोहोचू शकतो. वाटेत खाण्यापिण्याची सोय असली तरी शहरी माणसाला थोडं अवघडल्या सारखं होईल. पदार्थ चविला चांगले असले तरी स्वछता यथातथाच असते. संपुर्ण जगामधून लोक इकडे येत असतात परंतू त्याकडे अजून आपलं लक्षच नाही. स्थानिक लोक गाईडचं काम करतात एवढाच कायतो त्यांचा सहभाग, बाकी आपण या ठिकाणी खाण्याचे पदार्थ घेण्याची हिम्मत दाखवू शकत नाही. परंतू पुढे किमान चार तास आपण लेणी पहाणार असतो म्हणून पोटपुजा केलेली बरी. म्हणजे सौदर्याचा आस्वाद घेताना अस्वथता जाणवणार नाही. आपण जर औरंगाबादहून निघाणार असाल तर न्याहरी, फळं बरोबरच घेवून निघालेलं बरं. परतीच्या प्रवासात मी ड्रायव्हरचा सल्ला मानून एका धाब्यावर जेवलो चव चांगली तरी पहिले पाढे पंचावन्न, असो.

अजिंठा लेण्यांजवळ पोहोचलो तिकडे आपण नेलेलं वाहन ठेवण्यासाठी वाहनतळ आहे. पुढे अशा ठिकाणी असतात तशी दुकानं आहेत आणि अजिंठा लेण्यांविषयी महिती असलेली पुस्तिका विकणारे विक्रेते. पुस्तक विकत घेईपर्यंत मागे लागत रहातात. ६० रु. छापील किंमतीची पुस्तिका ३० रु. द्यायला तयार होतात. मी असच एक पुस्तक घेतलं. पुढे लेणी पाहताना त्याचा उपयोग झाला. एवढं सगळं झालं, पुढे जाण्यासाठी एस्.टी.च्या २x२ आसन व्यवस्था असलेल्या असलेल्या बस जवळ आलो. ( अजिंठा लेण्यांजवळ जाण्यासाठी या बसचा वापर करावा लागतो ) ५ ते ६ मिनीटात उतरायचं झालं. आंध्रप्रदेशमध्ये रामोजी फील्मसिटीत जाताना असचं बसने जाव लागतं त्याची आठवण झाली. नकळत मनातल्यामनात एक तुलना सुरू झाली. \ ७ व्या शतकातल्या प्रगत हिंदुस्थानच्या वेळची कलाकारी बघण्यासाठी आज जात होतो. रामोजी फील्मसिटीत आपण जे बघतो ती २१ व्या शतकातली प्रगती एवढ्या शतकांनंतर आपण एवढेच पुढे गेलो ?

लेणी पहाण्यासाठी ५ रु. प्रती व्यक्ती तिकीट आहे ते काढून पुढे गेलो. घोड्याच्या आकाराची प्रचंड व्ह्याली तीला लागून असलेला पुर्ण डोंगर खडकाचाच त्या खडकात हि लेणी कोरली आहेत. एकूण २९ लेण्यांमधील १,,१६,१७,२४ ही लेणी पहावीच, बाकी काही अर्धवट तर काही कमी महत्वाची त्यात ९,१०,१९,२६,२९ चैत्य (पुजास्थळं) व इतर विहार (आश्रम) आहेत. बुध्दाच्या जीवनातील विविध प्रसंग आणि बौध्द देव-देवता यांचं व्यापक चित्रण लेण्यातून तसेच चित्रांमधून दाखवलेलं आहे. जवळ- जवळ ७०० वर्षे वापरात असलेली लेणी नंतर अचानक वापरली गेली नाहीत, पुढे हजार वर्षाहून जास्तकाळ अज्ञात असलेला हा परिसर १८१९ साली शिकारीसाठी निघालेल्या जॉन स्मिथ या ब्रिटीश लष्करी अधिकार्‍याच्या अचानक दृष्टीस पडला आणि पुन्हा उजेडात आला. ४०० वषे खपून आकारास आलेल्या लेण्यांचा हा थोडक्यात इतिहास. थायलंड, मलेशिया, जपान इथून आलेल्या बौध्द पर्यटकां बरोबरच लामा आणि बौध्द भिक्कूही नजरेस पडले.



अमग्डॅलॉईड प्रकारच्या खडकात ५६ मी. उचीवर असून एकंदरीत ५५० मीटर पर्यंत नालाच्या आकारात हिलेणी पसरलेली आहेत. इतका संमृध्द पुरातन वारसा निट जपला गेला आहे असं पाहून वाटत नाही.

महत्वाच्या लेण्यात नेमलेले कर्मचारी पर्यटकांना जुजबी माहिती देवून पैसे उकळण्यातच धन्यता मानतात. लेणी खराब होउनयेत, चित्रांच्या रंगावर परीणाम होउनये म्हणून कॅमेर्‍याचे फ्लाश वापरू नयेत असे ते सांगतात पण आग्रही रहात नाहीत. महाराष्ट्राला गड-कील्ल्या बरोबरच या लेण्यांचा सुंदर वारसा लाभलाय पण हा जतन कोण करणार ?  

लेखकः नरेंद्र  प्रभू



19 February, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ८)

आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. पत्थरसाहेब गुरूद्वारा, मॅग्नेटीक हिल, सिंधु आणि झंस्कारचा संगम, आल्ची हि लडाखमधील प्राचीन गुंफा याना भेट देत आम्ही जेव्हा मूनलँडवर पोहोचलो, तेव्हा पुन्हा एकदा कॅमेरे सुरूच राहीले. चंद्रभूमिला स्पर्श केल्याच्या जोशात आम्ही नमकिला पास पार करून कारगिल केव्हा गाठलं ते समजलच नाही. आता माणसांची चेहरेपट्टी, वागणं बदललं होतं. युध्दाच्या आठवणी दाटून आल्या. दुसर्‍या 

दिवशी द्रास येथील युध्दस्मारकाला भेट दिली तेव्हा डोळे पाणावले. टायगर हिल, तोलोलिंग टेकड्या आशा जवळून पाहून आपल्या सैनिकानी काय दिव्याला तोंड दिलं त्याची कल्पना आली. तिथे २६ जुलैच्या विजय दिनाची तयारी सुरू होती. ऑपरेशन विजयच्या खाणाखुणा मिरवत हे स्मारक मोठ्या दिमाखात उभं आहे.

सोनमर्गला " भारतीय सेना आपका स्वागत करती है " असा फलक बघून आमचे पाय जमिनीवर आले. लहान असतो तर पुन्हा लडाखला जायचय म्हणून हट्ट धरला असता. एवढा सुंदर प्रदेश बघितल्यावर मला सोनमर्ग, श्रीनगर मध्ये स्वारस्य नव्हतं. गेल्या ८ - १० दिवसात आम्ही आयुष्यभर पुरेल एवढा ठेवा मिळवला होता, नवीन ओळखी पक्क्या झाल्या होत्या, मैत्री दृढ झाली होती. आता आपापल्या घरी जायचं हे मानायला मन तयार होत नव्हतं. लडाखी लोकांचं आदरातिथ्य आणि आमचे संयोजक आत्माराम परब यांच्या सहवासाला आम्ही मुकणार होतो. सुंदरशा भेट कार्डाद्वारे आभार मानून त्यानीही आमच्या भावनांना दाद दिली. भरलेल्या अंतःकरणाने आणि भारावलेल्या मनःस्थितीत आम्ही लडाखला रामराम केला तरी अजून संपूर्ण लडाख मनात घर करून आहे. हिमालयाशी दोस्ती करून आम्ही परतलो ते पुन्हा भेटण्याचं नक्की करूनच !    


(समाप्त)                                    जायचय  लडाखला चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू


 

14 February, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ७)

एव्हाना संपुर्ण ग्रुप एकत्र आला होता. मैत्री तर कधीच झाली होती. आज आम्ही डिस्कीट या छोट्याशा गावातच रहायला होतो. रात्री कँम्प फायर झालं, आज सगळ्यानाच कंठ फुटले होते. दोन वाजून गेल्यावर आम्ही झोपेच्या 

स्वाधीन झालो. सकाळी जाग आली तर बाहेर पाऊस पडत होता. डिस्कीट गुंफेला भेट देऊन परतीच्या प्रवासास सुरवात केली. आज खारडुंगलाचं रुप पालटलं होतं. बर्फवृष्टी होत होती. आता मात्र आम्हाला रहावलं नाही. कसल्याही संभाव्य त्रासाची 

पर्वा न करता आम्ही तासभर बर्फवृष्टीचा आनंद घेतला. खुप मजा केली. लेह जवळ आलं तसं वातावरण बदललं स्वछ उन्हाने लेह न्हाऊन निघालं होतं.

लडाखचे धार्मिक उत्सव हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. अशा उत्सवासाठी लडाखी आणि पर्यटक खुप दुरवरून येतात. आम्ही गेलो तेव्हा फँग गुंफेत महोत्सव सुरू होता. अनेकविध पुरातन वस्तूंची दुकाने थाटलेल्या त्या जागी गेलो आणि हरवून गेलो. विविध लडाखी खॆळ, नाट्य, नृत्यप्रकार बघण्यासाठी आम्ही हजारोंच्या गर्दीत मिसळून गेलो. त्याच उत्सवातून बाहेर पडून जेव्हा शांतीस्तुपाला भेट दिली तेव्हा संध्याकाळच्या शांत वेळी, एवढ्या उंचीवर बुध्द खरंच भेटल्याचा भास झाला.

(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू



10 February, 2009

इच्छा, शक्ती आणि इच्छाशक्ती

एखादी गोष्ट करायची झाली तर प्रथम ती करायची इच्छा पाहीजे. पण अनेकांच्या कितीतरी इच्छा अपुर्ण रहातात त्या शक्ती नसल्याने. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच कोणतही काम होतं, असं असलं तरी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर पराक्रम करणारेही आहेत. नाही का ?

आता प्रवासाचच घ्या ना. कुणाला विदेशवारीचं आकर्षण असतं तर कुणाला उंचच उंच शिखरं खुणावत असतात. इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य ते शक्य होतं म्हणूनच एव्हरेस्ट सर करू शकला माणूस, तो सुध्दा एकदा नव्हे अनेकदा. हिमालय पादाक्रांत करायचा म्हटलं तर कित्तेकदा शारिरीक ताकदी पेक्षा मानसिक कणखरपणाच कामी येतो महाराजा. माझी ताकद संपली म्हटलं तर संपली, चालणार असा निर्धार केला तर पोहोचतोच माणूस मुक्कामाला. हे झालं प्रवासाला निघाल्यावरचं पण त्या आधीच इच्छा, शक्ती आणि इच्छाशक्ती या तीन गटांतली माणसं काय करतात बघा.

शक्ती आहे पण इच्छाच नाही त्याना आपण सोडून देऊ, परंतू इच्छा आहे आणि शक्तीही आहे त्याचं काय ? त्याना तर जाणं सहज शक्य असतं तरी काहीजण नाही जात. का ? जायचं तर आहे पण पैसे असले तरी खर्च करवत नाहीत, इथे स्वार्थ किंवा कंजूसपणा आड येतो. मग कारणं सुरू होतात, जाऊ पुढच्या वेळी किंवा अचानक तब्येत बिघडली तर ? पाऊस पडला तर ? भुस्खलन झालं तर ? दरडी कोसळल्या तर ?

एकदा हिमालयात जायच्या गप्पा सुरू होत्या, तर एक महाशय मला म्हणाले तिकडे शिजलेलं अन्न नाही मिळलं तर, सगळच मुसळ केरात. मी म्हणालो " अहो अन्न प्रेशर कुकर मध्ये शिजऊ आणि तिथे लोकं रहातातच की ", पण महाशय मानायला तयार नाही. दुसरे एक असेच पुढच्यावेळी आम्हाला सांगा आम्ही नक्की येणार असं म्हणाले होते म्हणून म्हटलं चला मी जातोय तर नाही पुढच्यावेळी बघू आता बायकोची तब्येत जरा बिघडलीय, आता बोला अशांसाठी हिमालय अधिकच उंच नाही का होणार ?

तिसरा गट मात्र खमका आहे. शारिरीक, आर्थीक ताकदीवर मात करून जायचं म्हणजे जायचच. जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर ही मंडळी गगनाला गवसणी घालतात तेव्हा त्यांच्या इच्छाशक्तीला सलाम करावाच लागतो. एक पाय नसलेली किंवा सत्तरी ओलांडलेली माणसं जेव्हा लडाख सारख्या दुर्गम भागात यशस्वी भ्रमंती करून येतात तेव्हा त्यांच्या निश्चयाला दाद द्यावीशी वाटते. ' पंगुर्लंघते गिरी ' यालाच म्हणतात ना ? शारिरीक अपंगत्व किंवा वाढतं वय याला उपाय नाही पण मानसीक अपंगत्वाचे धनी कोण ? जरा विचार केला पाहीजे नाही का ? करूया

लेखकः नरेंद्र  प्रभू



04 February, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ६)



आज आम्ही नुब्रा व्हॉलीकडे प्रयाण करत होतो. पण त्याआधी आणखी एक मुख्य आकर्षण होतं ते खारदुंगला पासचं - जगातील सर्वात उंच मोटारवाहतुकीचा रस्ता तेथूनच जातो. १६३६० फूट उंचीवर आम्ही पोहोचलो स्वर्ग दोन बोटच उर्ला होता. भारताचा तिरंगा फडकवतच आम्ही ग्रुप फोटो काढला . सैनिकांशी नेहमीप्रमाणे हितगुज करुन आम्ही डिस्कीटच्या दिशेने निघालो. इथे निसर्गाचं आणखी 

एक वेगळं रुप पहायला मिळालं ते हुंडर येथे. लडाखचं 

वाळवंट येथे आहे. उंटावरुन स्वारी, वाळूच्या टेकद्या , तर्‍हेतर्‍हेचे आकार आणि आकाशात ढगांची गर्दी. चारही बाजूला निसर्गाचच वर्चस्व. माणूस इथे शून्य आहे असं वाटत आसतानाच तिथलं आकाशवाणी केंद्र बघून धक्काच बसला. दोन बैठ्या इमारती, त्यातूनच कारभार चाललेला. छप्परही नसलेला जगातला सर्वात उंच पेट्रोलपंप सगळच आश्चर्यकारक. एका पूलाजवळ आम्ही पोहोचलो, तिथून पुढे जायला पर्यटकांना बंदी होती. त्यापुढे एक गाव व नंतर पाकव्याप्त काशिर. सैनिकांशी पुन्हा एकदा मनमोकळ्या गप्पा. वातावरण भारावलेलं.

(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates